पणजी -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनण्याबाबतची भूमिका तूर्तास गुलदस्त्यात ठेवली आहे. आताच सर्व सांगितले तर नंतर काय सांगणार, अशा शब्दांत त्यांनी तर्क-वितर्क कायम राहतील याची निश्चिती केली.
गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. ती निवडणूक लढवण्याचा निर्णय ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने घेतला आहे. त्या निर्णयानंतर ममता गोव्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांची शुक्रवारी येथे पत्रकार परिषद झाली.
त्यावेळी पत्रकारांनी त्यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनण्याविषयीचा प्रश्न विचारला. त्यावर इतक्यात पत्ते खोलणार नसल्याचे ममतांनी सूचित केले. गोव्यातील निवडणूक लढवणे हा तृणमूलच्या पुढील लोकसभा निवडणुकीसाठीच्या व्यापक योजनेचा भाग आहे का, असेही पत्रकारांनी विचारले. त्यावर त्या उत्तरल्या, लोकसभा निवडणूक आम्ही लढवणारच आहोत. आम्ही लपाछपी खेळणार नाही. आमचा पक्ष पारदर्शक आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारून तृणमूलने सलग तिसऱ्यांदा बंगालची सत्ता मिळवली. त्यानंतर तृणमूलने इतर राज्यांतही विस्तारण्याचा संकल्प जाहीर केला. त्यातून त्या पक्षाने गोवा आणि त्रिपुरावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका निभावण्यास ममता सज्ज झाल्याचे मानले जात आहे.