शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील विद्यमान सरपंच किरण झंजाड यांनी गेल्या दहा वर्षांत गावाचा विकास साधत उत्कर्ष केला आहे. ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच, सरपंच अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली आहे. त्यामुळे त्यांनी शिरूर तालुक्यात एक विकासात्मक ठसा उमटवला आहे. वयाच्या 23व्या वर्षी उपसरपंचपदाची संधी मिळाल्यानंतर गावविकासाचा ध्यास त्यांनी घेतला. एक आदर्श सरपंच, अशी प्रतिमा निर्माण करून ती जपण्याचे काम किरण झंजाड यांनी केले आहे. त्यांच्या कार्यकाळावर टाकलेला प्रकाशझोत….
शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावातील शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले किरण झंजाड यांची ओळख आहे. त्यांचे वडील रामदास मारुती झंजाड हे लष्करी सेवेत होते. आई गृहिणी आहेत. एक मोठा भाऊ, दोन बहिणी, असा त्यांचा परिवार आहे. शेतीवाडी असल्याने शेतीशी नाळ जुळलेले हे झंजाड कुटुंबीय सर्वांना परिचित आहे.
रामदास मारुती झंजाड यांनी देशसेवा करून निवृत्तीनंतर गावी परतले. त्यानंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेती बघत त्यांनी समाजातील गरजू, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात दिला आहे. सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व समाजघटकांमध्ये एक माणुसकीची ओंजळ रिती करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे गावात त्यांच्याविषयी एक आदरयुक्त वलय आहे.
किरण झंजाड यांचे शिक्षण गावात जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिरूर येथील सी टी बोरा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एफ. वाय. बीएपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांना राजकारणाचे क्षेत्र खुणावू लागले. 2013 मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी प्रभाग दोनमध्ये किरण झंजाड यांनी सदस्यपदाची निवडणूक लढवली. वडिलांच्या पुण्याईमुळे त्यांना मतदारांनी साथ दिली.
दोन वर्षांनंतर त्यांना उपसरपंचपदाची संधी मिळाली. त्या संधीचे सोने केले. त्यानंतर 2018 मध्ये ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होती. त्यावेळी त्यांनी निवडणूक लढवली नाही. लोकनियुक्त सरपंच दत्तात्रय कुरंदळे यांचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. किरण झंजाड यांचे बंधू रवींद्र झंजाड यांनी राजीनामा दिला. यानंतर प्रभाग दोनमधून किरण झंजाड यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर किरण झंजाड यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. वयाच्या 23 व्या वर्षी किरण झंजाड यांना सरपंचपदाची संधी मिळाली.
ज्या वयात शिक्षण घेऊन नोकरी, तसेच कुटुंब चालविण्याची जबाबदारी पडते. त्याच वयात किरण झंजाड यांच्यावर गावाचा कारभार पाहण्याची जबाबदारी आली. गावचा कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्यावर गावकऱ्यांनी विश्वासार्हतेची मोहोर उमटवली. शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील एक तरुण, उद्योन्मुख चेहरा म्हणून किरण झंजाड यांना लोकमान्यता मिळाली आहे. सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर किरण झंजाड यांना गावाचा कारभार पाहण्याची संधी मिळाली. यात त्यांना शेवटचे दीड वर्षे मिळाली आहेत. किरण झंजाड यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत गावचा विकास साधण्यावर भर दिला. आईवडिलांची पुण्याईमुळे या सरपंचपदापर्यंत मी पोहोचू शकलो, असे त्यांनी अभिमानाने प्रांजळपणे नमूद केले. विनम्रता, सौजन्यता, संयमी व्यक्तिमत्व गावाला मिळाल्याचा गावकऱ्यांना अभिमान आहे.
किरण झंजाड यांच्या कार्यकाळात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार बाबुराव पाचर्णे, युवा नेते राहुलदादा पाचर्णे यांनी विकासकामासाठी भरीव निधी दिला. सर्व सदस्य आणि नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी गावात विकासकामे केली आहेत. वयाच्या 21 व्या वर्षापासून त्यांना राजकारणात संधी मिळत गेली. त्या संधीचे सोने करण्याची किमया साधली आहे. विकासात्मक चेहरा असलेल्या अण्णापूर गावात ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच अशी चढती कमान त्यांनी अनुभवली आहे.
शिरूर-राजगुरूनगर रस्त्यावर असलेले छोट्या लोकसंख्येचे आण्णापूर गाव. तरुणांची फौज एकत्र करीत गावचा अल्पावधीत कायापालट करण्याचे काम तरुण, तडफदार युवा सरपंच किरण झंजाड यांनी केले आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. दुसऱ्या टर्मला तरुण वयातच पुन्हा गावचा सरपंच झाल्यानंतर विविध विकासकामांचा डोंगर उभा करीत कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणत गावाचा चेहरामोहरा त्यांनी बदलून टाकला आहे.
यामध्ये दलित वस्ती सुधारणा, हायमॅक्स दिवे, गावठाणातील सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे रस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुधार निधी, प्लॅस्टिक स्टोअरेज युनिट, कचराकुंड्या, स्मशानभूमीतील रंगरंगोटी, वृक्षारोपण, गावाला पाणीपुरवठा करणारी टाकी, विहीर तसेच झंजाड वस्ती, येवले माथा, कुरंदळे वस्ती, पत्राकुंरदळे वस्ती, पवार मळा यांना पाणीपुरवठा योजनेतून घरोघरी पिण्याच्या पाण्याचे नळ उपलब्ध करून दिले आहेत. म्हसे, शिनगरवाडी व पारनेर तालुक्यातील नागरिकांना एमआयडीसीकडे जाण्यासाठी सर्वांत जवळचा मार्ग असणाऱ्या आण्णापूरजवळ नदीवर तब्बल 2 कोटी 36 लाख रुपयांचा पूल मंजूर करून आणण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. याकामी त्यांना माजी खासदार शिवाजीरावदादा आढळराव पाटील, भाजपाचे राहुलदादा पाचर्णे, ग्रामसेविका सारिका दरेकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी मोलाची मदत केली आहे.
उपसरपंचपदाच्या कार्यकाळातील कामे
किरण झंजाड यांनी उपसरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गावासाठी मूलभूत सुविधांवर भर दिला. गावकऱ्यांचा सर्वांगिण विकास हाच त्यांचा ध्यास होता. त्या कसोटीवर ते खरे उतरले. 2015 ते 2018 या कालावधीत झंजाड वस्ती सभामंडपासाठी 21 लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे. येवले माथा ते झंजाड वस्ती रस्त्यासाठी 20 लाख रुपये, कुऱ्हे वस्ती सभामंडपासाठी 7 लाख रुपये, बनकर वस्तीसाठी पाण्याची टाकीसाठी 10 लाख रुपये, अण्णापूर- पेठ ब्लॉकसाठी 20 लाख रुपये निधी मंजूर करून हे काम त्यावेळी मार्गी लावले आहे. सुमारे 78 लाख रुपयांचे काम त्यावेळी तीन वर्षांत मार्गी लावले होते. ही चुणूक गावाने अनुभवली.
दृष्टिपथातील मंजूर विकासकामे
किरण झंजाड यांनी 2022 ते 2023 या कालावधीत 40 लाखांची विकासकामे मंजूर करून आणली आहेत. झंजाड वस्ती स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी 10 लाख रुपये, रासकर वस्ती गटार लाइनसाठी 12 लाख रुपये, दलित वस्ती अंतर्गत पेव्हिंग ब्लॉकसाठी 10 लाख रुपये, अण्णापूर गावठाण ग्रामपंचायतजवळ सभामंडपसाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मंजूर करून आणताना किरण झंजाड यांची दूरदृष्टी दिसून येत आहे. यासाठी त्यांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, (स्व.) माजी आमदार बाबूराव पाचर्णे, राहुलदादा पाचर्णे यांची साथ मिळाली.
एक वर्षांतील लक्षवेधी कामे
किरण झंजाड यांनी गेल्या वर्षभरात (2022- 2023) या एक वर्षांत लक्षवेधी कामे मार्गी लावली आहेत. अण्णापूर ते कर्डिलवाडी रस्त्यासाठी 2 कोटी 36 लाख रुपये, विठ्ठल-रुकमाई मंदिर ते देवाचा रोडसाठी 10 लाख, आंबेडकरनगरसाठी 5 लाख, अण्णापूर ते झंजाड वस्तीसाठी 30 लाख, 15 व्या वित्त आयोगातून बबन मेजर घर या मार्गासाठी 4 लाख रुपये निधी मंजूर करून कामाचा निपटारा केला आहे.
समन्वयाचा समतोल
किरण झंजाड यांनी विकासकामाचा ध्यास घेतल्यानंतर अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. त्याचबरोबर अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. यात त्यांचे सातत्य आणि चिकाटी दिसून येत आहे. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी समन्वय साधला आहे. ग्रामसेविका सारिका दरेकर यांनी साथ दिली. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेवले आहे.
संकलन : अरुणकुमार मोटे, सविंदणे