अलवर (राजस्थान) – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेला ‘मोहब्बत का दुकान’ (प्रेमाचे दुकान) असे संबोधले आहे . त्यांनी म्हटले आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नफरत का बाजार (द्वेषाचा बाजार) सुरू केला आहे. त्यावर मी मोहब्बत का दुकान(प्रेमाचे दुकान) उघडत आहे. मी ही यात्रा का करत आहे, असे विचारणाऱ्या भाजप नेत्यांना ही माझी प्रतिक्रिया आहे, असे त्यांनी आज येथे बोलताना सांगीतले.
राहुल येथे एका रॅलीला संबोधित करत होते, ते म्हणाले की आपल्या 100 दिवसांच्या पदयात्रेत अनेक गावांमधील आणि शहरांमधील छतावर उभे अनेक भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या नेत्यांनी आपली ही यात्रा पाहिली. त्यातील अनेकांनी आपल्याला हात हलवून प्रतिसादही दिला. ते म्हणाले की आपण ही यात्रा का करीत आहोत अशी विचारणाही भाजपचे लोक करताना दिसतात. त्यावर त्यांना माझे वरीलप्रमाणे उत्तर असते.
ते म्हणाले की त्यांचे “मोहब्बत का दुकान” हे काही नवीन नाही. कारण महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सदर पटेल, बीआर आंबेडकर आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासह सर्व कॉंग्रेस नेत्यांनीही ब्रिटिश राजवटीपासूनच्या स्वातंत्र्यलढ्यातील द्वेषाच्या विशाल बाजारपेठेमध्ये”अशीच “प्रेमाची दुकाने” उघडली होती. ”
भाजप नेत्यांशी आपले कोणतेही वैर नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. भाजपच्या लोकांशी आपले मतभेद असू शकतात, पण ते सगळे मला आवडतात. भाजपचे लोकही एक दिवस या प्रेमाच्या प्रवासात सहभागी होतील असे मतही त्यांनी व्यक्त केले. भाजपला उद्देशून ते म्हणाले की, तुम्ही माझा तिरस्कार करू शकता आणि माझ्या विषयी वाईट बोलू शकता, तुमचा बाजार द्वेष विकतो तर माझे दुकान प्रेम विकते,असे ते म्हणाले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार बल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासारख्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून गांधी म्हणाले, या सर्वांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकानही उघडले होते. आम्ही तेच करतो.” भारत जोडो यात्रा,स्वतंत्र भारतातील कोणत्याही नेत्याची सर्वात लांब अंतराची आणि मोठी पदयात्रा असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. सध्या राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात असलेली ही यात्रा येत्या दोन दिवसांत या राज्यातून हरियाणात पोहचणार आहे.