रायबरेली (उत्तर प्रदेश) – रायबरेली लोकसभा जागा ही उत्तर प्रदेशातील सर्वाधिक चर्चेत असलेली जागा आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने जिंकलेली राज्यातील ही एकमेव जागा आहे. त्यावेळी सोनिया गांधी येथून विजयी होऊन लोकसभेत पोहोचल्या होत्या. सोनिया आता राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. या जागेवरुन गांधी-नेहरु कुटुंबातील सात जण विजयी झाले आहेत.
१९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर येथून निवडणूक जिंकली. रायबरेलीची स्वतंत्र जागा १९५७ मध्ये अस्तित्वात आली तेव्हा फिरोज गांधी पुन्हा एकदा येथून खासदार झाले. १९६० मध्ये फिरोज गांधी यांचे निधन झाले.
फिरोज गांधींच्या मृत्यूनंतर १९६७ मध्ये इंदिराजींनी रायबरेली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार बीसी सेठ यांचा ९१,७०३ मतांनी पराभव केला. यानंतर १९७१ ला इंदिरा गांधी यांनी संयुक्त समाजवादी पक्षाचे राज नारायण होते यांचा १ लाख ११ हजार ८१० मतांनी पराभव केला. मात्र, इंदिरा गांधींवर सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत राजनारायण यांनी निवडणूक निकालांना अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची निवडणूक बेकायदेशीर ठरवली होती. त्यानंतर काही दिवसांनी देशात आणीबाणी लागू करण्यात आली.
देशात आणीबाणीचा कालावधी संपत असताना १९७७ मध्ये जनता लाटेत रायबरेलीतून निवडणूक लढवणाऱ्या इंदिरा गांधींचा भारतीय लोकदलाचे उमेदवार राजनारायण यांनी ५५,२०२ मतांनी पराभव केला. नंतर इंदिराजींनी कर्नाटकातील चिकमंगळूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि जिंकून त्या संसदेत पोहोचल्या.
१९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी जनता पक्षाच्या विजयाराजे सिंधिया यांचा १,७३,६५४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत इंदिराजींनी आंध्र प्रदेशातील मेंडक या जागेवरूनही विजय मिळवला. त्यांनी रायबरेली मतदारसंघाचा राजीनामा दिला आणि मेंडकच्या खासदार राहिल्या.
इंदिरा गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर रायबरेलीत पोटनिवडणूक झाली होती. यावेळी अरुण नेहरू येथून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत अरुण नेहरूही याच जागेवरून विजयी झाले होते. अरुण यांनी लोकदलाच्या सविता आंबेकर यांचा २,५७,५५३ मतांनी पराभव केला.
१९८९ मध्ये येथून इंदिरा गांधींच्या मावशी काँग्रेसच्या शीला कौल यांनी जनता दलाचे उमेदवार रवींद्र प्रताप सिंह यांचा ८३,७७९ मतांनी पराभव केला. १९९१ मध्ये शीला कौल यांनी जनता दलाचे उमेदवार अशोक कुमार सिंह यांचा ३,९१७ मतांनी पराभव केला. शीला कौल यांचे पती कमला नेहरू यांचे भाऊ होते.
१९९६ मध्ये काँग्रेसने शीला कौल यांचा मुलगा विक्रम कौल यांची सुरक्षा अनामतही जप्त झाली होती. कौल यांना २५,४५७ मते मिळाली जी एकूण मतदानाच्या केवळ५.२९% होती. निकालात भाजप उमेदवार अशोक सिंह ३३,८८७ मतांनी विजयी झाले. १९९८ च्या निवडणुकीत शीला कौल यांची मुलगी दीपा कौल या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार होत्या. पण भाजपचे उमेदवार अशोक सिंह ४०,७२२ मतांनी विजयी झाले.
१९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसने रायबरेलीची जागा परत मिळवली. यावेळी पक्षाचे उमेदवार कॅप्टन सतीश शर्मा यांनी सपाचे गजाधर सिंह यांच्यावर ७३,५४९ मतांनी विजय मिळवला. गांधी कुटुंबातील अरुण नेहरू यावेळी भाजपाकडून उभे होते. २००४ मध्ये सोनिया गांधींनी अमेठीची जागा सोडली आणि स्वतः रायबरेलीमधून निवडणूक लढवायला सुरुवात केली. सोनिया गांधींनी सपाचे अशोक कुमार सिंह यांचा २,४९,७६५ मतांनी पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत सोनिया गांधींनी रायबरेलीतूनच बसपाचे आरएस कुशवाह यांच्यावर ३,७२,१६५ मतांनी विजय नोंदवला.
त्यानंतर 2014 मध्येही या जागेवरून सोनिया गांधींनी दणदणीत विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी भाजपचे अजय अग्रवाल यांचा ३,५२,७१३ मतांनी पराभव केला. त्याच वेळी, 2019 मध्ये सोनिया गांधींनी भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांना १,६७,८४८ मतांनी आपली जागा राखली होती.