कोणत्याही गोष्टींमध्ये बढाया मारण्यासाठी किंवा आपणच श्रेष्ठ आहोत हे सांगण्यासाठी “हे तर काहीच नाही’ हा शब्दप्रयोग वापरला जातो आणि नंतर काही अतिरेकी किंवा बढाईयुक्त गोष्टी सांगितल्या जातात. एखादी धाडसाची घटना सांगण्यासाठी किंवा एखादा विनोद सांगण्यासाठीसुद्धा “हे तर काहीच नाही’ हा शब्दप्रयोग वापरून विनोद किंवा घटना सादर केल्या जातात; पण आता हा शब्दप्रयोग दुर्दैवाने महाराष्ट्रातील राजकारणासाठीसुद्धा वापरावा लागणार आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिनिधित्व करणारे सर्वच राजकीय पक्षांचे नेते “हे तर काहीच नाही’ या तत्त्वावरच आता राजकारण करत आहेत. एखाद्या पक्षाने एखादी गोष्ट केली किंवा एखादा आरोप केला तर त्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याच्या नादात “हे तर काहीच नाही’ हे दाखवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यापासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील संबंध काही सौहार्दपूर्ण आणि सहकार्याचे राहिलेले नाहीत.
एकमेकांवर नेहमीच कुरघोड्या करण्याचे आणि आरोप-प्रत्यारोप करण्याचे प्रयत्न या दोन्ही बाजूंनी केले जातात; पण गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोवा विधानसभेमध्ये भाजपाला यश मिळवून देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा जेव्हा त्यांच्या होमपीचवर नागपूर येथे सत्कार करण्यात आला तेव्हा त्यांनी “भाजप आता स्वबळावर सत्तेवर येईल’, अशी घोषणा केली. या घोषणेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी “भाजपला महाराष्ट्रात सत्तेवर येऊ देणार नाही’, असे आव्हान दिले. या सर्व गोष्टी सुरू असतानाच भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी होळीनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडीतील पंचवीस आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची घोषणा केली, तर या दाव्याला उत्तर देताना “हे तर काहीच नाही’ या थाटात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले. तर अब्दुल सत्तार यांनी भाजपचेच पन्नास आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले.
मुळात रावसाहेब दानवेंनी जो दावा केला तो खरा होता का, याचे संशोधन करण्याची गरज असतानाच तो दावा न तपासता राऊत यांनी “हे तर काहीच नाही’ या थाटात आमच्याकडे भाजपचेच आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. मुळात भाजपच्या संपर्कात असलेले तथाकथित आमदार असतील किंवा महाविकास आघाडीच्या संपर्कात असलेले भाजपचे तथाकथित आमदार असतील, हे आमदार कशाची वाट बघत आहेत या प्रश्नाचे उत्तर या दोन्ही पक्षांनी देण्याची गरज आहे. आम्ही राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न करणार नाही; पण आगामी निवडणुकीनंतर आम्ही स्वबळावर सत्ता मिळवू, असा दावा एकीकडे देवेंद्र फडणवीस व्यक्त करत असताना त्यांच्याच पक्षातील नेते अशा प्रकारचे सरकारमधील आमदारांना फोडायची भाषा करत असतील, तर त्यावर कितपत विश्वास ठेवायचा याचा विचार करावा लागेल. केवळ सभा गाजवण्यासाठी आणि टाळ्या मिळवण्यासाठी बोलण्यात आलेल्या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याच प्रकारची प्रतिक्रिया किंवा विधाने करून “हे तर काहीच नाही’ या पद्धतीने मते मांडण्याची गरज होती का, याचाही विचार करावा लागणार आहे.
केवळ विधाने करण्याबाबतच नव्हे तर काही कृती करण्याबाबतसुद्धा महाराष्ट्रात “हे तर काहीच नाही’ तत्त्वावर राजकारणाने जोर पकडला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्याला अनेक वेळा नोटिसा पाठवून तेथील अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत सूचना करण्याची घटना ताजी असतानाच आता महाविकास आघाडी सरकारमधील एक मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अनिल परब यांचा दापोली येथील एक रिसॉर्ट अनधिकृत असल्याने तो पाडण्यासाठी आपण 26 मार्चला तेथे जाणार असल्याची घोषणा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. केंद्रीय तपास संस्था महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांवर कारवाई करत असताना आता महाराष्ट्रातील तपास संस्थांनी भाजपचे प्रवीण दरेकर आणि इतर नेत्यांवर कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे. आणखी काही नेते महाराष्ट्रातील तपास संस्थांच्या रडारवर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्याचवेळी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मालमत्ताचा विषय समोर आला आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या आणि उत्तर प्रत्युत्तराच्या खेळात आणि “हे तर काहीच नाही’ या चुकीच्या तत्त्वावर चालणाऱ्या राजकारणाला खरे तर महाराष्ट्रातील सामान्य नागरिक कंटाळून गेला आहे. नुकत्याच देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या.
त्यापैकी पंजाबमध्ये ज्याप्रकारे आम आदमी पक्षाने प्रस्थापितांना बाजूला सारून सत्ता स्थापन केली ते उदाहरण ताजे असतानाही महाराष्ट्रसारख्या महत्त्वाच्या राज्यातील राजकीय पक्ष अद्यापही जागे होत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाने आतापर्यंत कधीच असा सुडाचा प्रवास पाहिलेला नाही. दुर्दैवाची बाब हीच आहे की खरोखरच एखादा राजकीय नेता किंवा बडी व्यक्ती जर एखाद्या गुन्ह्यामध्ये दोषी नसेल तर त्याच्यावर झालेल्या कारवाईकडेसुद्धा याच नजरेतून पाहिले जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न आता भाजपने सोडून दिले असतील आणि आगामी निवडणूक स्वबळावर लढून बहुमताने सत्ता स्थापन करण्याचा विश्वास त्यांना वाटत असेल तर आता त्यांनीच या राजकारणाला योग्य वळण देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
कारण मुळात विरोधी पक्षांनी केलेली काही विधाने आणि कृतीमुळेच सुडाच्या राजकारणाचा हा प्रवास सुरू झाला आहे. साहजिकच भाजपच्या नेत्यांनी आता केंद्रीय तपास संस्थांचा सहारा न घेता राज्य पातळीवर आपले राजकारण करून स्वबळावर पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू केले तरच राजकारणाला योग्य वळण लागू शकेल अन्यथा हे आरोप-प्रत्यारोपांचे आणि उत्तर-प्रत्युत्तराचे राजकारण चालूच राहील. प्रत्येक पक्षाचा नेता आरोप करताना किंवा प्रत्यारोप करताना आणि उत्तर आणि प्रत्युत्तर देताना “हे तर काहीच नाही’ या शैलीतच माध्यमांना सामोरे जाईल.