पुणे/औंध- बाणेर-बालेवाडी परिसरामध्ये महापालिका प्रशासनाकडून पदपथावर गवत, झाडाझुडपांची शेती केली जात आहे का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पदपथावरील गवत काढण्यासह स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरूनच चालावे लागत आहे.
बाणेर-बालेवाडी परिसरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. यात लाखो रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांची रुंदी वाढवून पदपथाचे देखील सुशोभिकरण करण्यात आले आहे; परंतु पदपथाची वेळोवेळी देखरेख केली जात नसल्यामुळे गवत तसेच झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. झडाझुडपांनी पदपथ पूर्ण व्यापून गेला आहे. बालेवाडी येथील अष्टविनायक चौक ते मिटकॉन कॉलेज रोड, औंध-बाणेर लिंक रोड तसेच परिसरातील विविध ठिकाणी पदपथाची दुर्दशा झाली आहे.
करोना प्रादुर्भावामुळे परिसरातील मैदाने बंद आहेत. यामुळे मॉर्निंग तसेच इव्हेनिंग वॉक, तसेच रनिंगसाठी नागरिक पदपथाचा मोठा वापर करतात.
सकाळी तसेच संध्याकाळी मोठी गर्दी असते; परंतु पदपथावर झाडेझुडपे तसेच गवत वाढल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे.
मुख्य रस्त्यावरून वाहने वेगाने धावतात, अशावेळी अपघाताचा धोका संभवतो.