राहाता – मराठा आरक्षणासह मनोज जरांगे यांच्या उपोषणला पाठिंबा म्हणून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला खासदार. डॉ.सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. यावेळी सरकारला तातडीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे. पण ते आरक्षण न्यायालयात टिकणारे असावे असा सरकारचा प्रयत्न आहे. असे ते म्हणाले.
राहात्यात सोमवारपासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू केले आहे. बुुधवारपासून हे उपोषण अधिक तीव्र करण्यासाठी आमरण उपोषण बसण्याचा निर्णय जगन्नाथ चौधरी, मुन्ना सदाफळ, तुषार सदाफळ, राहुल शिंदे यांनी घेतला. त्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तीन दिवसांपासून राहाता परिसरातील विविध गावातील समाज बांधवांनी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. बुधवारी दुपारी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणास बसलेल्या नागरिकांशी चर्चा केली.
ते म्हणाले, सध्या संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहे. नेत्यांना गावबंदी तसेच दगडफेक होत असल्यामुळे या विषयावर कोणी बोलायला तयार नाही. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून एकत्र येऊन हा विषय हाताळणे गरजेचे आहे.
आरक्षणबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कागदपत्राची पूर्तता असलेल्या 11 लाख नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येकाने संयम ठेवावे मराठा आरक्षण मिळण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी मुकुंदराव सदाफळ, कैलास सदाफळ, डॉ. के. वाय. गाडेकर, डॉ.बापूसाहेब पानगव्हाणे, राष्ट्रवादीचे संदीप सोनवणे, ऍड रघुनाथ बोठे, राहुल सदाफळ, सागर सदाफळ, प्रवीण सदाफळ, गणेश बोरकर, संतोष बोरकर, अजय आग्रे, मनोज सदाफळ, अनिल बोठे, दत्ता सदाफळ, मनोज सदाफळ, विजय सदाफळ, उपस्थित होते. या उपोषणास डॉ. स्वाधीन गाडेकर, विजय बोरकर, नामदेव लावरे, सागर बोठे, राधाकिसन सदाफळ, अक्षय बोठे, प्रदीप कोल्हे आदींनी भेट दिली.