पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पक्षाला जबर धक्का बसला आहे. पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्याची सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रुपाली ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’,” असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील।जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' @Rupalipatiltho1
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 15, 2021
“सप्रेम जय महाराष्ट्र, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत.यापुढेही आपले आशीर्वाद आणि मा.”श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल. जय महाराष्ट्र,” असं रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, रुपाली पाटील यांचा मनसे पक्षांर्गत बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळेच अखेर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता त्या कोणत्या पक्षात जाणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या रुपाली पाटील ठोंबरे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात असे म्हटले जात आहे. रुपाली पाटलांकडूनही लवकरच याबाबत घोषणा करू असे सांगण्यात आले आहे.