पणजी -भाजपच्या नेतृत्वाखालील नवे सरकार स्थापन झाल्यानंतर गोवा विधानसभेचे पहिले अधिवेशन बुधवारी समाप्त झाले. विश्वासदर्शक ठरावाविनाच त्या दोन दिवसीय अधिवेशनाचे सूप वाजले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 20 जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, तो पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकला नाही. अर्थात, 2 आमदार असणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आणि 3 अपक्षांनी पाठिंबा दिल्याने पुन्हा सरकार स्थापण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला.
बहुमत सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल, अशी चर्चा होती. अधिवेशनातील दुसऱ्या आणि अखेरच्या दिवसाच्या कामकाजात त्या ठरावाचा उल्लेखही करण्यात आला होता. मात्र, कामकाजातून ठरावाचा विषय वगळण्यात आला. राज्यपालांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले नाही.
त्यामुळे विश्वासदर्शक ठराव मांडण्याची गरज भासली नाही, असे सरकारमधील सुत्रांनी स्पष्ट केले. विश्वासदर्शक ठराव मांडण्याची वेळ न आल्याने सरकार विधानसभेत भक्कम स्थितीत असल्याचे सूचित झाले.