पिंपरी, दि. 20 – गर्भावस्थेच्या जेमतेम साडेपाच महिन्यात जन्म झालेल्या आणि अवघे 400 ग्रॅम वजन असलेल्या अशा नवजात अर्भकाला साईकृपा हॉस्पिटलच्या डॉ. शुभांगी कांबळे आणि सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जीवनदान दिले आहे. रुग्णालयातील 94 दिवसांच्या उपचारानंतर बाळाचे वजन 400 ग्रॅमवरुन दोन हजार 130 ग्रॅमपर्यंत वाढले आहे. त्यानंतर बाळाला घरी सोडण्यात आले. आता बाळ आठ महिन्यांचे झाले असून सुखरुप आहे. त्यामुळे बाळाचे आई-वडील आनंदात आहेत.
याबाबतची माहिती प्रसुती तज्ज्ञ डॉ. शुभांगी कांबळे यांनी गुरुवार (दि.19) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाळाचे वडील शशिकांत पवार, आई उज्वला पवार, डॉ. बोरा आदी उपस्थित होते. याबाबतची माहिती देताना साईकृपा हॉस्पिटलच्या प्रसुती तज्ज्ञ डॉ. शुभांगी कांबळे म्हणाल्या, उज्वला पवार या गेल्यावर्षी मे महिन्यात प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या युट्रसला एक लहान आणि एक मोठा असे दोन भाग आहेत. लहान भागात गर्भधारणा झाली होती. या गर्भधारणेत फारतर 6 महिने प्रसुती पुढे जाण्याची शक्यता दिसत होती. त्यामुळे गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यातच रुग्णाला जास्त त्रास होत होता. त्यामुळे मार्च महिन्यातच पिशवीचे तोंड बंद केले होते. त्यावेळी चौथा महिना सुरु होता. सहाव्या महिन्यापर्यंत रुग्णाला तीनवेळा रुग्णालयात दाखल व्हावे लागले. शेवटच्यावेळी रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी रुग्णाला जास्त कळा सुरु झाल्या होत्या. त्यावेळी गर्भावस्थेचे फक्त 24 आठवडे झाले होते. सामान्यत: 38 ते 40 आठवड्यांमध्ये प्रसुती होते.
सातव्या महिन्यापर्यंत स्ट्रेच करण्यासाठी यूट्रसला रिलॉक्स करणारे इंजेक्शन दिले. विविध उपचार केले. पण, 24 व्या आठवड्यातच प्रसुती झाली. बाळाचे वजन केवळ 400 ग्रॅम होते. त्यामुळे मोठी गुंतागुंत होती. सूर्यामधील डॉक्टरांनी बाळाला जीवदान देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. फुफ्फुसे श्वासासाठी खुले करणारी औषधे दिली. बाळाला नाळेतून औषधे आणि पोषक आहार दिला. दीड महिना बाळाने व्हेंटिलेटरवर उपचार घेतले. रुग्णालयातील 94 दिवसांच्या उपचारानंतर मुलीच वजन 400 ग्रॅमवरुन दोन हजार 130 ग्रॅमपर्यंत वाढले आहे. बाळ सुखरुप असल्याचेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.