पुणे – रिंगरोडसाठी मुठा व मोसे खोऱ्यातील शेतकऱ्यांची जी जमीन संपादित केली जाणार आहे त्याच्या बदल्यात आम्हाला चार पट नुकसान भरपाई नको तर आम्हाला जमीनीच्या बदल्यात जमीनच मिळावी अशी मागणी या खोऱ्यातील काहीं शेतकऱ्यांनी केली आहे.
या संबंधात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की या खोऱ्यातील शेतकऱ्यांकडे मुळातच कमी जमीनी राहिल्या आहेत. आता आणखी जमीन संपादन केल्यानंतर येथील भूमी पुत्रांना देशोधडीला लागावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना जमीनीला जमीनच मिळणे गरजेचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
ज्यांच्या जमीनी जाणार आहेत त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी मिळावी, रिंगरोडसाठी 2016 साली जी आखणी करण्यात आली होती ती का बदलली याचा खुलासा करून त्या प्रकरणाची चौकशी करावी, येथे जी वृक्षतोड होणार आहे ती वाचवण्यात यावी आदि मागण्या त्यांनी केल्या असून या मागण्या मान्य होणार नसतील तर या भागातील रिंगरोड प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या निवेदनावर गोपाळ पायगुडे, दत्तात्रय पायगुडे, श्रीपती पायगुडे, विलास पायगुडे, चंद्रकांत लिमये, शंकर पायगुडे यांची नावे आहेत.