पुणे – भारत यजमान असलेल्या यंदाच्या “जी 20 परिषदे’ला पुण्यात सोमवारपासून सुरूवात होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत 33 पेक्षा अधिक देशांमधील सुमारे 66 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने “भविष्यात शहरांची उभारणी’ या मुख्य विषयावर विचारमंथन होणार असून, “वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हाने’ यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सहसचिव सोलोमोन आरोकीयाराज यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दोन दिवसांच्या नियोजनाविषयी माहिती दिली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी होईल. या बैठकीमध्ये “जी 20′ चे सदस्य देशांचे तसेच 13 आमंत्रित देशांचे प्रतिनिधी तसेच जागतिक बॅंक, आशियाई विकास बॅंक, जागतिक व्यापार संघटना आदींचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
पुण्यातील बैठक ही “जी 20′ देशांच्या “इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची बैठक आहे. या वर्षभरात या ग्रुपच्या चार बैठका होणार आहेत. पुण्यातील परिषदेत सात सत्र होणार आहेत. त्यामुळे पहिल्या सत्रात वर्षभरातील बैठकांचा कृती कार्यक्रम आणि आराखडा निश्चित केला जाईल. उद्घाटनानंतरची दोन सत्र आणि भोजनानंतर हे प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जातील. तेथे आशियाई विकास बॅंकेतर्फे “भविष्यातील शहरांच्या विकासासाठी अर्थपुरवठा’ या विषयावर चर्चासत्र होईल. तसेच अन्य चर्चासत्रही तेथेच आयोजित केले जाणार आहेत. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
मंगळवारी तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा होईल. त्यानंतर बैठकीचा समारोप होईल. बैठकीनंतर पर्यटनाची इच्छा असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना पुणे दर्शन, पुण्यातील “हेरिटेज टूर’ किंवा महाबळेश्वर टूर असे पर्याय सुचवण्यात आले आहेत, त्यानुसार त्यांचे पुढील नियोजन करण्यात येणार आहे.
शहरीकरणावर विस्तृत चर्चा
जी-20 समूहामध्ये विकसित आणि विकसनशील देशांचा समावेश आहे. विकसनशील देशांपुढे वाढत्या शहरीकरणाचे आव्हान आहे. विकसित देशांमध्ये शहरीकरण ही समस्या नसली, तरी त्यांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर विस्तारणाऱ्या शहरांसाठी अर्थपुरवठा, त्यासाठीचे नवे पर्याय यावरही या बैठकीत विस्तृत चर्चा होईल, असे आरोकीयाराज यांनी नमूद केले.