अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेतले जाणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्या दिनांक 3 डिसेंबरपासून नाशिकमध्ये सुरू होणार आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलेले ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होत असल्याने त्याला निश्चितच महत्त्व प्राप्त होत आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करोना महामारीच्या कालावधीतच सर्व नियंत्रण शिथिल झाल्यावर हे संमेलन घेतले जात असल्याने दीर्घ कालावधीनंतर साहित्य रसिकांना काहीतरी चांगले ऐकण्याची आणि अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अर्थात, आतापर्यंत झालेल्या सर्व साहित्य संमेलनामध्ये ज्याप्रमाणे कोणता ना कोणता वाद निर्माण झाला होता त्याप्रमाणे या संमेलनामध्येही वादाची झालर दिसत आहे.
साहित्य संमेलन आणि राजकारणी यांचे संबंध असावेत की नसावेत हा दीर्घकाळ चर्चेचा विषय आहे आणि यावेळी पुन्हा एकदा तो विषय चर्चेत आला आहे. नाशिक हे शहर राज्यातील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ यांची कर्मभूमी असल्याने आणि त्यांच्याशी संबंधित भुजबळ नॉलेज सिटीमध्येच हे संमेलन होणार असल्याने या संमेलनावर अर्थातच छगन भुजबळ यांचा प्रभाव आहे.
संमेलनाचे नियोजन करताना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमपत्रिकेत कोठेही उल्लेख करण्यात न आल्याबद्दल वाद निर्माण केला जात आहे. तसेच नाशिकमधील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनाही या संमेलनापासून डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे. संमेलन व्यासपीठावरही महाविकास आघाडीचे नेतेच दिसत असल्याची तक्रार आता भाजपतर्फे केली जात आहे.
मुळात साहित्य संमेलने ही राजकारण्यांपासून बाजूला असावी तशीच भूमिका घेतली जात असल्याने राजकीय पक्षाचे किंवा त्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे नाव घेतले जात नसेल, तर फारसा बाऊ करण्याची गरजही नाही. याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एका साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावर न बसता प्रेक्षकांमध्ये बसून संमेलनाचा आस्वाद घेतला होता ही गोष्ट सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला हवी.
आतापर्यंत झालेली संमेलने पाहता जो पक्ष सत्तेवर आहे त्याच पक्षांचे नेते व्यासपीठावर दिसतात. हा शेवटी सांस्कृतिक विषय असल्यामुळे त्या सरकारमध्ये सांस्कृतिक खाते सांभाळणाऱ्या मंत्र्यालाही व्यासपीठावर स्थान मिळते. अनेक वेळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काही प्रमुख मंत्री साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांमध्ये संमेलनामध्ये निश्चितच हजेरी लावतात. या निमित्ताने रसिकांनाही एखादी राजकीय जुगलबंदी अनुभवता येते.
या संमेलनाचे संपूर्ण नियोजन छगन भुजबळ यांनी केले असल्याने ते भाजपने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन काही निर्णय घेतात का, हे आज उद्या लक्षात येईल. पण तरीसुद्धा साहित्य संमेलन हा साहित्य रसिकांचा उत्सव असल्याने याबाबत फारसा बाऊ करण्याचीही गरज नाही. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रसिकांच्या पदरी काय पडणार आहे ते जास्त महत्त्वाचे आहे. सुदैवाने या वेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली असल्याने अध्यक्षीय भाषणामध्ये “विज्ञान आणि साहित्य’ याबाबत एखादा चांगला विचार मांडला जाण्याची शक्यता आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षासाठी निवडणूक न घेता एखाद्या पात्र ज्येष्ठ साहित्यिकाची निवड या पदावर करावी, असा निर्णय झाल्यानंतर जयंत नारळीकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या भाषणामध्ये ते कोणता मुद्दा मांडतात हे निश्चितच औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे आधुनिक काळामध्ये वाचनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होत असताना आणि नव्या पिढीच्या हातात सोशल मीडियासारखं एक शस्त्र असताना या नव्या पिढीला पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळवण्यासाठी काही करता येऊ शकेल का, याबाबतचे विचार मंथन या साहित्य संमेलनात होणे गरजेचे आहे.
या पिढीला वाचनाकडे वळवण्यासाठी केवळ पुस्तकेच नव्हे तर आधुनिक माध्यमांचा वापर करूनही त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होऊ शकते, असा विचार अध्यक्ष नारळीकर निश्चितच पुढे नेऊ शकतात. गेल्या काही संमेलनातील अनुभव बघता संमेलनस्थळी जे प्रकाशकांचे विविध स्टॉल उभारण्यात आलेले असतात त्या स्टॉलमध्ये पुस्तकांची फारशी विक्री होत नाही, अशी तक्रार प्रकाशक करतात. या कालावधी व्यतिरिक्त इतर वेळीही लोक दुकानात जाऊन पुस्तक खरेदी करतात हे प्रमाणही कमी झाले आहे.
या याबाबतचे काही विचारमंथन या संमेलनात होणे अपेक्षित आहे. ई-बुक किंवा डिजिटल रीडिंगच्या माध्यमातून वाचनाची आवड जोपासणे आणि वाढविणे सहज शक्य आहे, याबाबतही विचार या संमेलनात व्हायला हवा. नवीन पिढीच्या प्रतिनिधींनी एखादे पुस्तक खरेदी करून ते वाचायला पाहिजे असे नाही, तर त्यांच्या मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर जर एखादे ई-बुक उपलब्ध झाले आणि ते त्याचा आस्वाद घेत असतील तर तेसुद्धा स्वागतार्ह आहे. त्यामुळे आधुनिक काळात होणाऱ्या साहित्य संमेलनांमध्येही जुने विचार न मांडता नवी पिढी कोणत्याही
प्रकारे वाचत असेल तरी त्याचे स्वागत करायला हवे आणि अशा प्रकारचे विविध पर्याय नव्या पिढीला उपलब्ध करून देण्यासाठीचे विचारमंथन साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर होणे गरजेचे आहे. केवळ एक वार्षिक कर्मकांड म्हणून आणि राजकारण्यांना उपलब्ध होणारे व्यासपीठ म्हणून या संमेलनाकडे पाहणे थांबवले गेले पाहिजे. साहित्यविषयक जे व्यवहार होणे अपेक्षित आहे ते सर्व व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी आता साहित्य संमेलनाशी संबंधित सर्व साहित्यिक आणि साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी.
वाचक जर पुस्तकांपर्यंत पोहोचत नसतील तर पुस्तकांना कोणत्याही स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी करावे लागेल, हाच विषय या निमित्ताने महत्त्वाचा मानावा लागणार आहे. सुदैवाने नारळीकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष असल्याने आधुनिक जगातील साहित्य व्यवहार कसा विज्ञानावर आधारित असेल याबाबत विचारमंथन त्यांच्या भाषणात असेल असे वाटते. सर्व वाद-विवाद बाजूला ठेवून हे साहित्य संमेलन यशस्वी होईल आणि रसिकांच्या पदरी काही तरी भरीव पडेल अशी आशा यानिमित्ताने करावी लागेल.