पिरंगुट – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत समुपदेशन करण्यासाठी, ताणतणाव दूर करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोफत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन संस्थेतील समुपदेशकांकडून शंकाचे निरसन करावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी केले आहे.
याबाबत संस्थेचे मानद सचिव ऍड. संदीप कदम म्हणाले, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत समुपदेशन करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून उपमुख्यमंत्री, संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने स्वतंत्र मोफत हेल्पलाइन सुरू केली. गेली दोन वर्षांपासून करोनामुळे शाळा बंद आहेत. गतवर्षी दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा झाल्या नाहीत. वर्षभराच्या मूल्यमापनावरून विद्यार्थ्यांचे गुणांकन केले गेले. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवित होते.
या शैक्षणिक वर्षात ऑक्टोबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाइन होणार हे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. इयत्ता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा व्यवसाय मार्गदर्शन पदविका हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले संस्थेत चौदा समुपदेशक आहेत.
हेल्पलाइनद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी राज्यातील ही एकमेव संस्था आहे. मनातील परीक्षेची भिती दूर करण्यासाठी, निकोप व आनंदी वातावरणात त्यांनी परीक्षा द्यावी यासाठी हेल्पलाईनचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख यांनी केले. यावेळी संस्थेचे उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव उपस्थित होते.