लोणंद (प्रतिनिधी) – खंडाळा तालुक्यातील लोणंदनजीक मरिआईचीवाडी येथील कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्या असल्या, तरी बर्ड फ्लूची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने रविवारी “रॅपिड रिस्पॉन्स टीम’ स्थापन केली आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेकडून अहवाल येण्यापूर्वीच संभावित बर्ड फ्लूचा सामना करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.
मरिआईचीवाडी येथील कापरे वस्ती व शिंदे वस्तीतील घरगुती पोल्ट्री फार्ममधील 85 ते 90 कोंबड्या अज्ञात रोगामुळे दगावल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यापूर्वीच दहा किलोमीटरचा परिसर “सतर्क क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे. त्याच अनुषंगाने पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील,
तालुका पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दर्शन काकडे, गटविकास अधिकारी बिचुकले, लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले, वन विभागाचे विश्वास मिसाळ, तलाठी खटावकर, लोणंद येथील पशुवैद्यकीय अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी आदींच्या उपस्थितीत लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात बैठक झाली.
त्यामध्ये बर्ड फ्लूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन “रॅपिड रिस्पॉन्स टीम’ (आरआरटी) स्थापन करण्यात आली. भोपाळ येथील प्रयोगशाळेकडून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संभाव्य “ऍक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. जालिंदर रासकर, कमलेश कापरे, सुरेश कापरे, चंद्रकात कापरे, प्रकाश रासकर, विजय खताळ, प्रवीण धोमकर या शेतकऱ्यांना यापुढील खबरदारीबद्दल या बैठकीत प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, शिंदे वस्ती व कापरे वस्तीचा एक किलोमीटर परिसर “अतिसतर्क क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.