देशात सध्या सत्तेवर असलेल्या आणि तिसर्यांदा पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची अपेक्षा बाळगलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर करून नेहमीसारखी निवडणूक व्यवस्थापनामध्ये आघाडी घेतली आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्याची अपेक्षा बाळगून एकत्र येण्याचा प्रयत्न करणार्या इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाचा निकाल अद्याप अंतिम झाला नसतानाच भाजपने आपल्या 195 उमेदवारांची यादी जाहीर करून विरोधी आघाडीला योग्य प्रकारचे संकेत दिले आहेत. इंडिया आघाडीतील आम आदमी पार्टी किंवा समाजवादी पक्ष या पक्षानी आपापल्या पातळीवर उमेदवारांची घोषणा केली असली तरी इंडिया आघाडीचे प्रमुखपद भूषवणार्या काँग्रेस पक्षाने मात्र अद्याप आपल्या उमेदवारी यादीबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही हे वास्तव आहे. अर्थात एकाच वेळी विरोधी आघाडीला संकेत देताना भाजपच्या नेतृत्वाने भाजपमधील इच्छुकांनाही योग्य प्रकारचे संकेत देण्याचे काम या उमेदवार यादीच्या माध्यमातून केले आहे. निवडून येण्याची क्षमता बाळगणार्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाईल हा विचार या उमेदवारी यादीतून स्पष्टपणे समोर येत आहेत शिवाय ज्या ठिकाणी इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे साटेलोटे झाले आहे.
तेथील निवडणूक आव्हानात्मक ठरणार असल्याने तेथील उमेदवारांचा विचारही जास्त गांभीर्याने करण्यात आला आहे दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील सात जागांसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये युती झाली असल्याने त्याची गंभीर दखल घेतली असून गेल्या दोन निवडणुकांमध्ये दिल्लीतील सातच्या सात जागा जिंकल्या असूनही त्यांनी यावेळी तब्बल चार उमेदवार नवे दिले आहेत. मनोज तिवारी या एकमेव विद्यमान खासदाराला पहिल्या उमेदवार यादीमध्ये स्थान देण्यात आले. अर्थात पूर्व दिल्ली मतदार संघातून गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी आधीच आपण निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघाचा उमेदवार अद्याप करण्यात आला नसला चार ठिकाणी मात्र उमेदवार बदलून भाजपने योग्य संकेत दिले आहेत. सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज हिला उमेदवारी दिल्यामुळे विरोधी पक्ष घराणेशाहीचा आरोप भाजपवर करू शकतात पण जर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीला आव्हान द्यायचे असेल तर अशा प्रकारचे इलेक्टिव्ह मेरिटचे सगळे उमेदवार देण्याची गरज भाजपाच्या नेतृत्वाने लक्षात घेतल्यानेच दिल्लीमध्ये हे बदल करण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांनाही उमेदवारी देऊन राज्यपातळीवरील या नेत्यांना केंद्र पातळीवर नेण्याचा विचार पण स्पष्ट केला आहे. अर्थात या पहिल्या यादीतील बहुतांशी नावे ही अपेक्षित आहेत साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच्या वाराणसी मतदार संघातून आणि अमित शहा गांधीनगर मधून आणि राजनाथ सिंग लखनऊ मधून लढणार हे अपेक्षितच होते. अर्थात 195 म्हणजे जवळजवळ एक तृतीयांश उमेदवारांची नावे जाहीर करून भाजपाने आघाडी घेतली असे म्हणावे तर महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशा 80 जागापाठोपाठ महाराष्ट्रात सर्वात जास्त 48 जागा आहेत पण पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही हे महत्त्वाचे आहे केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात जास्त चर्चेत असलेले महाराष्ट्रातील मंत्री नितीन गडकरी यांचा समावेशही पहिल्या यादीत करण्यात आलेला नाही.
अर्थात गेल्याच आठवड्यात केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली असल्याने या निरीक्षकांचा अहवाल आल्यानंतरच कदाचित दुसर्या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश होऊ शकतो इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रमध्ये विरोधी पक्ष जास्त प्रबळ असल्याने कदाचित भाजपचे नेतृत्व महाराष्ट्रातील उमेदवारांबाबतजास्त सावधगिरी बाळगत असावी सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात तीन पक्षांची युती असल्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन पक्षांना 48 पैकी किती जागा द्यायचा याबाबतही अद्याप कोणता निर्णय झाला नसल्याने त्याचाही परिणाम या उमेदवारी यादीवर झाल्याचा दिसून येतो देश पातळीवर 370 पेक्षा जास्त जिंकण्याचा आशावाद प्रगट करणारे भाजपचे नेते महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकण्याची घोषणा करत आहेत आणि ती घोषणा प्रत्यक्षात आणायची असेल तर महाराष्ट्रातील उमेदवारांची निवड करताना काळजी घ्यावी लागणार आहे.
आणि त्या काळजीतूनच पहिल्या यादीमध्ये या महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला नाही येत्या काही दिवसांमध्ये जेव्हा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाईल तेव्हा महाराष्ट्राचा विचार केला जाण्याची शक्यता आहे गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्याच खासदारांना पुन्हा तिकीट देणार का त्या ठिकाणी प्रयोग करणार हे सुद्धा लागणार आहे पण सहसा ज्या ठिकाणी विरोधी आघाडीची आव्हान जास्त तगडे आहे त्या ठिकाणी दिल्लीचा अपवाद वगळता कोणतेही नवे प्रयोग करण्याच्या मनस्थितीत भाजप नाही हे या यादी वरून तरी स्पष्ट होत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उमेदवारी यादीमध्ये भाजपच्या नेतृत्वाने तरुण उमेदवारांना प्राधान्य दिले आहे 50 पेक्षा कमी वय असणार्या अनेक उमेदवारांना संधी देण्यात आली आहे गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये इतर राजकीय पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या मुख्य नेत्यांचाही सन्मान करण्यात आला आहे.
त्यातूनच मध्यप्रदेश मधील ज्योतिरादित्य दत्त शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे इंडिया आघाडीतील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्येच उमेदवार जाहीर करण्यामध्ये विलंबाचे धोरण अवलंबले आहे आता भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर याच ठिकाणी इंडिया आघाडीचे कोणते उमेदवार उभे केले जाऊ शकतात याची चाचपणी करण्याची संधी आघाडीला मिळू शकते पण 195 उमेदवारांची यादी जाहीर करून केवळ या विषयात भाजपाने आघाडी घेतली आहे असे नाही तर हे सर्व उमेदवार आता प्रचारालाही लागणार आहेत आणि आपोआपच भाजपची प्रचारातही आघाडी होणार आहे हे तथ्य विरोधी आघाडीने नाकारून चालणार नाही देशात निवडणुकीची घोषणा कधी होणार याची कल्पना अर्थात सत्ताधार्यांना असल्याने त्याचा फायदा घेऊनच भाजपने ही यादी जाहीर केली आहे त्यामुळे आता त्यापासून योग्य संकेत घेऊन विरोधी आघाडीने सुद्धा आपल्या उमेदवारांचा आणि जागावाटपाचा विचार गांभीर्याने करायला हवा.