आगामी लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असतानाच देशातील दोन प्रमुख राजकीय आघाड्यांमध्ये मात्र ‘घडतंय बिघडतंय’ असे परस्परविरोधी वातावरण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीबाबतीतही काही अनुकूल आणि काही प्रतिकूल गोष्टी घडताना दिसत आहेत. दुसरीकडे, काँग्रेसच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाने स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये मात्र अद्यापही एकजिनसीपणा दिसत नाही. उलट संपणार्या प्रत्येक दिवसानंतर आघाडी बाबतीत काहीतरी नकारात्मक होतानाच दिसत आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध राजकीय घडामोडींवर नजर टाकली, तर एकसंध आघाडी म्हणून ही इंडिया आघाडी नरेंद्र मोदी यांच्या भाजप आघाडीला कसे तोंड देऊ शकेल याची शंका निर्माण होऊ शकते.
इंडिया आघाडीच्या आजपर्यंतच्या बहुतेक सर्व मोठ्या बैठकीला हजर राहिलेल्या काश्मीरमधील पीडीएफ या पक्षाच्या नेता मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला या दोघांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये एकत्र न लढता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने हा इंडिया आघाडीला मोठा धक्का आहे. काश्मीर या राज्यापुरती तरी इंडिया आघाडी अस्तित्वात नसणार आहे हे यावरून सिद्ध होत आहे. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यामध्येसुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचे की नाही याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. प्रकाश आंबेडकर दररोज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्या आजपर्यंतच्या मागण्या बघता त्या मान्य करून त्यांना महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच इंडिया आघाडीमध्ये स्थान दिले जाईल की नाही याबाबत शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. एकीकडे इंडिया आघाडीची परिस्थिती अशी असली तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर नवीन मित्र जमवत भाजपाच्या आघाडीने सकारात्मक वातावरण निर्मिती तयार केली आहे. भाजपचे एकेकाळचे मित्र पण काही कारणाने गेल्या काही कालावधीमध्ये दुरावलेले चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देशम पक्ष आणि जनसेना पक्ष हे आंध्र प्रदेशमधील दोन पक्ष एनडीएमध्ये सामील झाले असल्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये भाजप आघाडीची कामगिरी सुधारण्यास मदत होणार आहे. कोणत्याही लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेत्यांना नेहमीच दाक्षिणात्य राज्यातील कामगिरीबाबत चिंता असते. कारण या राज्यांमध्ये भाजपाला कधीच पाय रोवून उभे राहता आलेले नाही.
याच पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये देवेगौडा यांच्या जनता दलांबरोबर युती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाजपने ओरिसामध्येसुद्धा बिजू जनता दलाबरोबर युती करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 2000 पूर्वी दीर्घकाळ बिजू जनता दल हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होता. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक भाजप आणि बिजू जनता दल एकत्रपणेच लढत होते. अर्थात काही वर्षांपूर्वी बिजू जनता दलाने जरी भाजपशी मैत्री तोडली असली तरी बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांनी कधीही केंद्र सरकारवर किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली नाही. या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा नवीन पटनायक आपल्याकडे मैत्रीचा हात देतात का हे भाजपाला पहायचे होते; पण अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. बिजू जनता दलाने सध्या तरी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थात, आगामी कालावधीमध्ये काहीही घडू शकते. इंडिया आघाडीबाबत बर्याच नकारात्मक गोष्टी घडत असताना त्यांनी बिहारमध्ये चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. अर्थात, चिराग पासवान काय निर्णय घेतात हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. मुळात इंडिया आघाडी असो किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी असो या दोन्ही पक्षांचे घटक पक्ष जरी ठरले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणी किती जागा लढवायच्या याबाबत मात्र अजूनही काही ठोस घडताना दिसत नसल्याने आगामी कालावधीमध्ये ही चर्चासुद्धा रंगताना दिसणार आहे. त्यावरून काही गोष्टी बिघडताना दिसणार आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जागावाटप करून उमेदवारांची संख्या ठरवणे हे एक जिकिरीचे काम होऊन बसणार आहे. आणखी सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने त्याबाबत काही आश्वासने देऊन लोकसभा निवडणुकीमध्ये तडजोड करण्याची भूमिका घेण्याबाबत काही राजकीय पक्षांवर दबाव येऊ शकतो.
त्यातूनच काही बिघडू शकते. कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये भाजपला निवडून आणण्याचा चंग बांधलेली भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकीकडे आणि भाजपला सत्तेपासून रोखणे या जिद्दीने एकत्र येण्याचा प्रयत्न करणारी इंडिया आघाडी दुसरीकडे या दोघांसाठीही गेल्या काही दिवसांमध्ये काही घडत असले आणि काही बिघडत असले तरी दोन्ही गोष्टींचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होणे अपरिहार्य आहे. येत्या कालावधीमध्ये आणखी काही नवे मैत्रीचे हात पुढे केले जातील. त्याचवेळी जे जुने मित्र आहेत ते नाराज होणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल. आगामी निवडणूक एवढी चुरशीची होणार आहे की एका जागेवरील विजय किंवा एका जागेवरील पराभवही महत्त्वाचा ठरणार आहे. आता लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने दोन्ही बाजूंना जास्त दक्ष राहून काम करावे लागणार आहे. आघाड्यांमधील मतभेद किंवा जागा वाटपावरून निर्माण होणारी नाराजी ही मतदारांपासून लपून राहत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवूनच निर्णय घ्यावे लागणार आहेत.
महाराष्ट्रसारख्या राज्यात ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन विकास आघाडी आहे किंवा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे असे अनेक पक्ष निवडणुकीच्या कालावधीमध्ये महत्त्वाचे ठरू शकतात. देशातील अनेक राज्यांमध्ये स्थानिक पातळीवरील असे प्रादेशिक पक्ष प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि निवडणुकीमध्ये एखाद्या निवडणूक उमेदवाराला पाडणे किंवा त्याला निवडून आणण्याचे काम हे पक्ष अप्रत्यक्षपणे करू शकतात असेच आजपर्यंत सिद्ध झाले आहे. साहजिकच आगामी कालावधीमध्ये जे काही घडेल किंवा जे काही बिघडेल त्याचा आपल्या निवडणूक यशावर नकारात्मक परिणाम होणार नाही, याची खात्री सर्वच राजकीय आघाड्यांना करावी लागणार आहे.