ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी रोजी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने सरकारी आणि खासगी पातळीवरही राज्यात ठिकठिकाणी जरी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असले, तरी एक दिवस मराठी भाषेची अशी आठवण ठेवून मराठी भाषेला खरा गौरव प्राप्त होईल असे मान्य करणे मात्र भाबडेपणा ठरेल. कारण 365 दिवसांपैकी एक दिवस अशा प्रकारे मराठी भाषेचा सन्मान करणे म्हणजे केवळ कर्मकांडच ठरू शकते. जोपर्यंत समाजाच्या सर्व थरातील घटक दैनंदिन वापरामध्ये आणि व्यवहारामध्येसुद्धा मराठीचा प्राधान्याने वापर करत नाहीत तोपर्यंत मराठी भाषेला गौरव प्राप्त होणार नाही, हे वास्तव आता स्वीकारायची गरज आहे.
महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पुणे, मुंबई अशा अनेक महानगरांचा समावेश असल्यामुळे आपोआपच तेथे मेट्रोपॉलिटन समाज निर्माण झाला आहे. या समाजाची विविध प्रकारची भाषा असल्यामुळे प्रत्येकाने आपली भाषा पुढे नेण्याच्या नादात मराठीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. सर्वसामान्य मुंबईकरसुद्धा लोकलमध्ये प्रवास करत असताना किंवा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावर मराठीचा वापर न करता हिंदी किंवा इतर भाषांचा वापर करतो, हे वास्तव कसे नाकारता येईल. जोपर्यंत जाणीवपूर्वक व्यवहारामध्ये मराठीचा वापर होणार नाही आणि तो वाढणार नाही तोपर्यंत मराठी भाषेचे महत्त्व वाढणार नाही.
देशातील इतर राज्यांमध्ये ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्या राज्यांमधील नागरिकांसाठी ती भाषा हा अस्मितेचा विषय असताना दुर्दैवाने महाराष्ट्रासारख्या राज्यात मात्र विद्यमान तरुण पिढीला मराठी भाषेचा वापर करणे म्हणजे गावठीपणा वाटतो. जाणीवपूर्वक इंग्रजीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला मराठी येत नाही किंवा आपण मराठी व्यवस्थित बोलू किंवा लिहू शकत नाही याची लाज बाळगण्यापेक्षा ते स्टेटस सिम्बॉल म्हणून मिरवण्याकडे नव्या पिढीचा कल असल्याने या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा गौरव कसा वाढणार? अर्थात, केवळ दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करणे पुरेसे ठरणार नाही तर मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी जे इतर घटक आहेत त्या घटकांनाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मराठी चित्रपट अजूनही धडपडत आहेत.
अनेक चांगल्या आशयाचे चित्रपट प्रदर्शित होत असूनही त्यांना चित्रपटगृहे उपलब्ध होत नाहीत. जरी चित्रपटगृहे उपलब्ध झाली तरी मराठी प्रेक्षक अशा चित्रपटांकडे पाठ फिरवतात. राज्यातील कोणत्याही मल्टिप्लेक्स चित्रपटगृहामध्ये जर एकावेळी सहा-सात चित्रपट सुरू असतील तर त्यापैकी फक्त एक मराठी चित्रपट असतो बाकी सर्व चित्रपट इंग्रजी, हिंदी किंवा दक्षिणात्य भाषेतील असतात. म्हणजेच दक्षिणात्य चित्रपटही मराठीमध्ये लोकप्रिय होत आहेत पण मराठी चित्रपटाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. गेल्या काही कालावधीमध्ये नाटकांची परिस्थिती सुधारली असली तरी नाट्यगृहांची परिस्थिती वाईट आहे आणि नाटक पाहण्यासाठी जे तिकिटांचे दर आहेत ते सर्वसामान्य नागरिकाला परवडणारे नाहीत.
चित्रपट, नाटक याप्रमाणेच साहित्य या विषयाच्या माध्यमातूनही मराठी भाषेचा गौरव वाढू शकतो. पण नुकतेच अंमळनेर येथे जे मराठी साहित्य संमेलन झाले त्या संमेलनाला मिळालेला अत्यंत वाईट प्रतिसाद पाहता वाचन संस्कृतीच्या माध्यमातून मराठीचा गौरव कसा वाढवायचा याचाही गांभीर्याने विचार करायची गरज आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात होणारी छोटी छोटी साहित्य संमेलने आणि ग्रंथ महोत्सव यांना मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. साहजिकच मराठी भाषेचा व्यावहारिक स्वरूपात वापर करताना चित्रपट, नाटक आणि साहित्य या व्यासपीठावरूनही मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न होणे गरजेचेच आहे.
गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशा प्रकारची मागणी जोर धरत असली तरी अद्याप या दिशेने कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे आपण जेव्हा मराठी असा उल्लेख करतो तेव्हा ज्या मराठीच्या इतर भाषा भगिनी आहे त्यांचाही विचार एकत्रपणेच करण्याची गरज आहे. मराठी भाषेचा भाग असलेली कोंकणी भाषा असो किंवा खानदेशातील अहिराणी भाषा असो किंवा कोंकणातील मालवणी असो किंवा इतर कोणत्याही प्रकारची ग्रामीण किंवा नागरी बोली असो ती मराठी भाषाच आहे, असे गृहीत धरूनच प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रमाण मराठी भाषेचा आग्रह आता काही प्रमाणात जरी कमी झाला असला तरी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ज्या बोलीभाषा कार्यरत आहेत त्यांचे संवर्धनही करण्याची गरज आहे.
महाराष्ट्रातील दुकानांवर आणि संस्थांवर मराठी भाषेतील फलक असावेत हा निर्णय महाराष्ट्रामध्ये घ्यावा लागतो हीच सर्वात लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. महाराष्ट्राशिवाय देशातील इतर राज्यांमध्ये मात्र प्रादेशिक भाषांमध्येच फलक दिसतात, मग महाराष्ट्रामध्येच हा दुजाभाव का हा प्रश्नही आजपर्यंत कोणी विचारत नाही. न्यायालय पातळीवर आदेश दिल्यानंतरसुद्धा जेव्हा महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अनेक दुकानदार मराठी फलक लावायला नकार देतात तेव्हा मराठी भाषेची अवस्था ठळकपणे समोर येते. साहजिकच केवळ एक दिवस मराठी भाषा गौरव दिनाचे कर्मकांड करून काहीही साध्य होणार नाही.
समाजातील प्रत्येक घटकांमध्ये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांमध्ये जोपर्यंत मराठी भाषा मनापासून रुजत नाही तोपर्यंत मराठी भाषेचा गौरव खर्या अर्थाने वाढणार नाही. ज्या कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो त्या कुसुमाग्रजांनीच काही वर्षांपूर्वी मराठी भाषेचे वर्णन करत असताना ती मंत्रालयाच्या दारात एखाद्या भिकार्यासारखी गलितगात्र अवस्थेत उभी आहे, अशा शब्दांची रचना केली होती. सरकारी पातळीवर मराठी भाषेची किती उपेक्षा होत आहे हे दर्शवण्याचा त्यांचा उद्देश होता. आज इतक्या वर्षांनंतरही फारसा फरक पडलेला नाही.
साहजिकच सरकारी पातळीवर केवळ मराठी भाषा गौरव दिन साजरा करून काहीही होणार नाही, तर मराठी भाषेला व्यावहारिक स्वरूप देऊन दैनंदिन व्यवहारांमध्ये या भाषेचा जोपर्यंत शंभर टक्के वापर होत नाही तोपर्यंत मराठी भाषेलाही शंभर टक्के गौरव प्राप्त होणार नाही, हे या निमित्ताने समजून घेण्याची गरज आहे.