राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑक्टोबर रोजी “एक तारीख एक तास स्वच्छता’ या मोहिमेची घोषणा केली. त्याप्रमाणे काल एक ऑक्टोबर रोजी देशात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सर्वात प्रथम पंतप्रधान झाले तेव्हापासूनच त्यांनी स्वच्छतेचा विषय समोर घेतला. गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीमध्ये सातत्याने त्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवन कार्यामध्ये सतत स्वच्छतेला प्राधान्य दिले होते. हाच मंत्र स्वीकारून नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरू असली, तरी महात्मा गांधी यांनी नेहमी सामाजिक स्वच्छतेकडे जास्त लक्ष वेधले होते. भारतीय समाजामध्ये स्वच्छता ही एक जीवनशैली म्हणून विकसित करण्याची गरज आहे. गेल्या काही कालावधीमध्ये जरी भारताने भौतिक स्वरूपात चांगला विकास केला असला, तरी जगातील अनेक देशांच्या नजरेत आजही एक अस्वच्छ देश म्हणूनच भारताकडे पाहिले जाते हे वास्तव नाकारून चालणार नाही. देशातील सगळ्या महानगराचे साऱ्या जगाला जरी आकर्षण असले तरी याच महानगरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली झोपडपट्टी हे एक अस्वच्छतेचे मोठे उदाहरण मानले जाते.
अर्थात, महानगराच्या आश्रयाने वाढलेल्या झोपडपट्ट्या याच केवळ अस्वच्छतेचे कारण आणि उदाहरण आहेत असे नाही, तर सुशिक्षित लोकांमध्येसुद्धा स्वच्छतेची सामाजिक भावना अद्याप संपूर्णपणे विकसित झालेली नाही, हेही समजून घेणे गरजेचे आहे. महानगरांमध्ये विकसित झालेल्या रहिवासी संकुलांमधील अस्वच्छतेचे प्रमाणही लक्षात घेण्यासारखे असते. वैयक्तिक पातळीवर प्रत्येक जण जरी स्वच्छतेचा मंत्र जपत असला, तरी समाजात वावरताना मात्र प्रत्येकाला या मंत्राचा विसर पडतो. साहजिकच पर्यटनाच्या ठिकाणी किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी ज्या प्रकारे कचरा निर्माण केला जातो तीसुद्धा एक गंभीर बाब आहे. धार्मिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हार फुले आणि इतर गोष्टींपासून कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचे व्यवस्थित निर्मूलन केले जात नाही अशीच काहीशी परिस्थिती पर्यटनाच्या ठिकाणीसुद्धा असते. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करणारे अनेक लोक या अस्वच्छतेच्या माध्यमातून उलट पर्यावरणाला धोका निर्माण करण्याचे काम करत असतात. प्रवासाला जाताना ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टी नेल्या जातात त्यामध्ये बहुतेक वेळा पॅकेज म्हणून प्लॅस्टिकचा वापर केलेला असतो.
प्रवास करत असताना खाण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की या प्लॅस्टिकच्या गोष्टी सहजपणे खिडकीच्या बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे नंतरच्या कालावधीमध्ये प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा एक मोठा डोंगरच निर्माण होतो याचे भान कोणालाही नसते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील बहुतांशी नागरिकांना रस्त्यावर थुंकण्याची अत्यंत वाईट सवय आहे. जगातील अनेक देशांमध्ये अद्यापही भारतीयांचे वर्णन थुंकणाऱ्यांचा देश असेच केले जाते. सरकारी कार्यालय असोत किंवा खासगी इमारती असोत या इमारतींच्या जिन्याचे कोपरे आणि टेरेससुद्धा थुंकणाऱ्या लोकांमुळे गलिच्छ झालेले दिसून येतात. सामाजिक भान असलेली कोणतीही व्यक्ती अशा प्रकारचे गलिच्छ काम करणार नाही. एखादी व्यक्ती आपल्या घरामध्येसुद्धा अशा प्रकारे गलिच्छ प्रकार करणार नाही; पण घराच्या बाहेर पडल्यावर मात्र या लोकांचे सामाजिक भान सुटते आणि असे थुंकण्याचे व्यवहार केले जातात. भारतीयांची ही थुंकण्याची सवय लक्षात घेऊनच अनेक सार्वजनिक ठिकाणी जरी व्यवस्था केली असली तरी त्या यंत्रणेचा वापर कोणीच करत नाही.
चारचाकी वाहनातून जाणारे वाहनचालक आणि वाहनमालकसुद्धा खिडक्याच्या काचा खाली करून बाहेर थुंकण्याचे काम करत असतात. असेच काम सार्वजनिक एसटी बसमधून प्रवास करणारे प्रवासीही करत असतात. आपण अद्याप स्वच्छता ही जीवनशैली म्हणून स्वीकारली नसल्यानेच अशा प्रकारच्या गलिच्छ गोष्टी सतत घडत असतात. जेव्हा हे थुंकण्याचे गलिच्छ कार्य करणारे नागरिक जेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने परदेशात जातात तेव्हा तेथील स्वच्छतेचे वर्णन करतात; पण त्या परदेशी भूमीवर थुंकण्याचे धैर्य मात्र त्यांना होत नाही. कारण कोणत्याही परदेशात अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी थुंकता येत नाही; पण मायभूमीला आल्यावर मात्र या नियमाचा विसर पडतो आणि नेहमीप्रमाणे त्यांचे गलिच्छ व्यवहार सुरू राहतात. साहजिकच 2 ऑक्टोबरच्या निमित्ताने देश पातळीवर सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असली, तरी सर्वसामान्य नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठीसुद्धा विशेष प्रयत्न केले जाण्याची गरज आहे.
नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये स्वच्छता मोहिमेच्या निमित्याने अशा प्रकारचा एखादा कायदा करण्यात येईल असे सुतोवाच केले होते; पण गेल्या आठ वर्षांमध्ये अशा प्रकारचा कोणताही कायदा झाला आहे असे दिसत नाही. साहजिकच येत्या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई शक्य असणारा एखादा कडक कायदा करण्याचा निर्णय मोदी सरकारला घ्यावाच लागेल. कारण जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत ही सामाजिक अस्वच्छता चालूच राहणार आहे. खरेतर विद्यमान कायद्यांचा वापर करूनसुद्धा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करता येणे शक्य आहे. पण या कायद्याखाली सर्वसाधारणपणे केवळ किरकोळ दंड भरण्याची तरतूद असल्याने असा दंड भरून हे नागरिक पुन्हा एकदा अस्वच्छता करायला मोकळे होतात. पण सामाजिक अस्वच्छतेच्या गुन्ह्यासाठी कारावासाची किंवा मोठ्या दंडाची तरतूद असणारे कायदे केले जात नाहीत तोपर्यंत स्वच्छता ही जीवनशैली म्हणून नागरिक स्वीकारणार नाहीत.
अशा प्रकारचे कायदे होत असतानाच दुसरीकडे समुपदेशनाच्या आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातूनसुद्धा भारतीयांच्या मनात स्वच्छतेची सामाजिक जीवनशैली विकसित करण्याची गरज आहे. शालेय पातळीपासूनच मुलांच्या मनात स्वच्छतेचे महत्त्व अधिक प्रभावीपणे पटवून देण्याची गरज आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी जरी सामाजिक स्वच्छतेबाबत जाणीव निर्माण होत असली, तरी ही केवळ एका दिवसाची इव्हेंट न होता वर्षभर भारतीयांच्या मनात सामाजिक स्वच्छतेची जाणीव जागृत राहणे जास्त महत्त्वाचे आहे.