जुलै 1969 मध्ये झालेल्या वादग्रस्त व नाट्यमय अशा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातील दुही उघडपणे समोर आल्यावर, त्या पक्षात उभी फूट पडली. पक्षातील बरेच जुनेजाणते ज्येष्ठ नेते संघटना कॉंग्रेस पक्षात राहिले, तर बहुसंख्य कॉंग्रेसजन इंदिरा गांधी यांच्यामागे उभे राहिले. हा पक्ष कॉंग्रेस रिक्विझिशन (आर) किंवा नवकॉंग्रेस म्हणून ओळखला जाऊ लागला. मोरारजी देसाई, निजलिंगप्पा, अतुल्य घोष यासारखे ज्येष्ठ नेते संघटना कॉंग्रेसमध्ये राहिले आणि इंदिराजींबरोबर मुख्यतः तरुण नेते राहिले. कॉंग्रेस पक्षातील डाव्या विचारांचे नेते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या कलाने राजकारण करण्याचे प्रयत्न इंदिराजींनी सुरू केले. त्यामुळे त्यांची “गूँगी गुडिया’ ही प्रतिमा बदलून, झुंजार व पुरोगामी अशी तयार झाली.
चंद्रशेखर, कृष्णकांत, मोहन धारिया यांच्यासारखे “तरुण तुर्क’ इंदिराजींबरोबर होते. एक प्रकारे त्यावेळी इंदिराजींनी कॉंग्रेस पक्षातील बड्या धेंडांविरुद्ध बंड करून भाकरीच फिरवली होती. राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान व कॉंग्रेसचे प्रमुख झाले, तेव्हा त्यांनी पक्षातील सत्तेचे दलाल बाजूला करण्याची गर्जना मुंबईतील पक्षाच्या अधिवेशनात केली होती; परंतु ते त्यांना शक्य झाले नाही आणि त्यांची कारकीर्दच अल्पायुषी ठरल्यामुळे, भाकरी फिरवली जाण्याऐवजी, त्यांच्या भोवती अरुण नेहरू, अरुण सिंग प्रभृती नेत्यांची एक चौकडी तयार झाली. सोनिया गांधी यांनी पक्षातील अनुभवी नेत्यांनाच साथीला घेऊन सत्ता राबवली; परंतु राहुल गांधी अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या भोवती ज्योतिरादित्य शिंदे, जितीनप्रसाद, आरपीएन सिंग यांच्यासारखे तरुण नेते होते. पक्षाचा सातत्याने पराभव झाल्यानंतर हे तरुण नेतेही कॉंग्रेसला रामराम करून भाजपमध्ये दाखल झाले.
कॉंग्रेसचे एक साचलेले तळे झाले असून, योग्य वेळी नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि नव्या-जुन्या नेत्यांत सामंजस्य निर्माण करणे यात पक्षाला यश आलेले नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत तयार झालेल्या शरद पवार यांना, आपल्या गुरूने कॉंग्रेसमध्ये तरुणांना कसा वाव दिला आणि त्याचा पक्षाला कसा फायदा झाला, हे माहीत होते. त्यामुळे कॉंग्रेसबाहेर पडून जेव्हा त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, तेव्हा त्यांच्याबरोबर विनायक पाटील, पद्मसिंह पाटील यांच्यासारखे तरुणच होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केल्यानंतर पवार यांनी विजयसिंह मोहिते पटील, आर. आर. तथा आबा पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यासारख्या तरुणांना संधी देऊन, पक्षात महत्त्वाची पदे अथवा मंत्रिपदे दिली. त्यामुळे कॉंग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीचे डबके झाले नाही आणि त्यात तेव्हा साचलेपणही आले नाही.
त्यानंतरही राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये नवनवीन लोकांना संधी देण्यावर त्यांचा भर राहिला. आता पुन्हा एकदा, भाकरी फिरवली नाही, तर करपते. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे सूचक वक्तव्य पवार यांनी मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केले आहे. पद असो अथवा नसो. काही व्यक्तींना कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन नवे नेतृत्व तयार केले जाईल, असे पवार यांनी म्हटले आहे. पक्षात शैथिल्य येऊ नये आणि पक्ष चैतन्यशील राहावा, यासाठी ही गोष्ट आवश्यकच असते. 1960 साली स्वतः शरद पवार युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी झाले.
चार वर्षांतच ते पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख होऊन, 1966 साली राज्यातील कॉंग्रेसच्या युवकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. जीवनात यशस्वी होण्यासाठी तरुणांनी विचारधारा आणि कष्ट या दोन गोष्टींचा आधार घेतला, तर यश मिळेल, हा पवार यांनी सांगितलेला मंत्र मोलाचाच आहे. आता जे लोक संघटनेत मागील सात-आठ वर्षे एकाच पदावर काम करत आहेत, त्यात बदल करावा, नवीन युवकांना संघटनेत घ्यावे व त्यांना कामाची संधी द्यावी, या दृष्टीने पवार पावले टाकणार आहेत. राज्यात राष्ट्रवादीला आपला जनाधार वाढवायचा असून, त्यासाठी पवार या वयातही अथक मेहनत करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरील राज्यांतही हा पक्ष आपली मते वाढवण्याच्या धडपडीत असणे स्वाभाविक आहे.
मात्र, नवीन नेतृत्व तयार करून पक्षाचा चेहरा बदलण्याच्या या योजनेमागे आणखी काही अर्थ दडलेले आहेत का, हे बघणे आवश्यक आहे. मुळात गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वात त्याच त्याच नेत्यांनी उच्चपदे भूषवल्याचे दिसून आले. शिवाय हा पक्ष सरंजामदारांचा व सुभेदारांचा आहे, अशीही प्रतिमा झाली. ज्या अनेकांना पवारांनी मोठे केले, ते 2019 मध्ये बोट फुटली आहे, असे पाहून भाजपच्या दिशेने पळाले. मात्र, मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 53 आमदारांपैकी 40 जण अजित पवारांसोबत आहेत आणि भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांनी स्वतः या 40 आमदारांशी संपर्क साधला आहे, असा दावा करणारी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. त्यामुळे अजित पवार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या चर्चा सुरू झाल्या.
स्वतः अजित पवारांनी या बातमीत तथ्य नसून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच शेवटपर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु दुसऱ्या एका प्रकट मुलाखतीत त्यांनी आपण मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच काही शहरांतून “मनातले मुख्यमंत्री अजितदादा’, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले. कुटुंबातील काही व्यक्तींवर तपास यंत्रणांचा दबाव असल्यामुळे, कोणी काहीही निर्णय घेऊ शकते; परंतु राष्ट्रवादीचे धोरण मात्र भाजपविरोधाचे राहील, हे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्याशी एकनिष्ठ राहतील, अशा नेत्यांना हेरून, त्यांना संधी देण्यावर पवार यांचा भर दिसतो.