मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाचा समारोप झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी या उत्सवातील अतिउत्साहाबाबत जे विधान केले आहे, ते निश्चितच लक्षात घेण्यासारखे आहे. असे उत्सव निश्चितच साजरे करायला पाहिजेत; पण त्यावेळी योग्य प्रकारे नियमांचे पालन करून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, अशा आशयाचे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. आता काही दिवसांनी नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल आणि त्यानंतर दीपोत्सवही साजरा केला जाईल. इतर धर्मीयांचे काही सणही साजरे होतील.
यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांच्या अतिउत्साहाचा परिणाम जनजीवनावर होणार नाही याची काळजी या निमित्ताने घ्यावी लागणार आहे. ज्या प्रकारे यावर्षी गणेशोत्सवामध्ये महाराष्ट्रात सर्वत्रच स्पीकरच्या भिंतींचा मुक्त वापर झाला त्याचा संदर्भ घेऊन राज ठाकरे यांनी याबाबत विधान केले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्रच स्पीकर्सचा अतिवापर झाल्याने काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या. अति तीव्र आवाजाचा परिणाम होऊन अत्यंत कमी वयातील तरुणांचीही हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना पुणे, सांगली आणि इतरत्रही घडल्याचे समोर आले आहे.
अशा प्रकारच्या घटना प्रथमच घडल्या आहेत असेही नाही. कित्येक वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणूक काळातील या अतिरेकी आवाजामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या महाभयंकर आवाजामुळे एका घराची भिंत पडून काही लोक ठार झाल्याची घटनाही काही वर्षांपूर्वी घडली होती. सुमारे पाच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने स्पीकर्सच्या भिंतींचा वापर करूच नका अशा प्रकारचे निर्देश दिले होते; पण महाराष्ट्रातील बहुतेक प्रमुख शहरांमध्ये तेथील स्थानिक राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला विरजण लागू नये म्हणून डॉल्बीच्या वापराकडे दुर्लक्ष केले.
खरेतर ध्वनी प्रदूषणाबाबत काही कायदे आहेत आणि नियमही आहेत. सार्वजनिक ठिकाणी आवाजाचा वापर किती प्रमाणात करावा याबाबत काही नियम ठरवून दिलेले आहेत. तरीही केवळ गणेशोत्सव नव्हे तर इतर कोणत्याही उत्सवांमध्ये ध्वनीचा अतिरेक केला जातो. त्याचा त्रास शेवटी सर्वसामान्य नागरिकांनाच होतो. कोणत्याही शहरातील गल्लीबोळातील एखाद्या उदयोन्मुख नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करतानासुद्धा आता अशा प्रकारचा डॉल्बीचा वापर वाढला आहे. रात्री बारा वाजता या नेत्याचा वाढदिवस साजरा करत असताना मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले जातात आणि मोठ्या आवाजात गाणीही लावली जातात. रात्री बारा वाजता अशा प्रकारच्या भीषण आवाजाचा त्रास परिसरातील नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले आणि अभ्यासात मग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना किती होत असेल याचा विचार मात्र कोणीही करत नाही.
अतिरेकी आवाजाचा परिणाम कमी वयातील निरोगी तरुणांच्या हृदयावरही होत असेल, तर हृदयविकार असणाऱ्या नागरिकांना या ध्वनीचा किती त्रास होत असेल याचा विचारच करायला नको. सर्वच राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी एकत्रपणे या विषयाला पूर्णविराम देण्याची गरज आहे. पारंपरिक वाद्य वाजवूनसुद्धा गणेशाचे स्वागत केले जाते आणि त्याला निरोपही दिला जाऊ शकतो. ही साधी गोष्ट आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने गेल्या वर्षीच यंदाच्या उत्सवामध्ये शाडूच्या मूर्तींचा वापर केला जाईल, असे निर्देश दिले होते. पण यावर्षीही मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर झाला. या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळत नसल्याने जलप्रदूषणाचा मोठा धोका निर्माण होतो. या मूर्ती तयार करताना वापरण्यात येणारे रासायनिक रंग पाण्यामध्ये मिसळूनसुद्धा पाणी प्रदूषित होऊ शकते.
वैयक्तिक पातळीवर सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती होऊन मोठ्या प्रमाणावर मातीच्या मूर्तींचा वापर सुरू केला गेला असला तसेच घरीच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची प्रथाही आता सुरू झाली असली तरी तेवढी जनजागृती सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये अद्याप आलेली नाही. पुढच्या वर्षी येणाऱ्या गणेशोत्सवाचा विचार आतापासूनच करावा लागेल. गणेश उत्सवाच्या काही दिवस आधी जर कोणता निर्णय घेतला तर योग्य कालावधी उपलब्ध नाही, असे सांगून त्या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. म्हणून फक्त शाडूचाच किंवा मातीचाच वापर करण्याचा निर्णय असो किंवा गणेश आगमन आणि गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजाचा वापर करण्यावर बंदी घालण्याचा विषय असो त्याचा पाठपुरावा आतापासूनच केला तर पुढील वर्षापर्यंत बऱ्यापैकी जनजागृती होऊ शकेल. राज ठाकरे यांना हेच अपेक्षित आहे.
अर्थात, हा विषय फक्त गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही तर कोणत्याही सार्वजनिक समारंभ साजरा करत असताना ज्या प्रकारे ध्वनीप्रदूषण केले जाते त्या सर्वच बाबतीत काही मार्गदर्शक सूचना देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणतीही साधी मिरवणूक असो किंवा लग्नाची वरात असो किंवा लग्नसमारंभ ज्या ठिकाणी होतात ते कार्यालय असो सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साउंड सिस्टीमचा वापर करून नागरिकांना त्रास दिला जातो. महाराष्ट्र हा मुळातच उत्सव प्रिय प्रदेश असल्यामुळे दर काही दिवसांनी कोणता ना कोणता उत्सव साजरा केला जातो. आधुनिक काळामध्ये सर्वच धर्म आणि सर्वच जातींची अस्मिता मोठ्या प्रमाणावर जागरूक झाली असल्याने त्या धर्माशी किंवा जातीशी संबंधित उत्सव किंवा महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी यानिमित्ताने ज्या मिरवणुका काढल्या जातात त्यामध्येही अशा प्रकारे बेलगामपणे मोठ्या आवाजाचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे उद्योग केले जातात.
त्या धर्माच्या उत्सवाला वापर करण्यासाठी परवानगी दिली मग आम्ही का वापरायचा नाही, अशा प्रकारची विचारणा आपोआपच दुसऱ्या धर्माच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि याचा वापर करण्याची ही प्रक्रिया सतत सुरू राहते. धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा वैयक्तिक उत्सव असो त्याच्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा निर्माण झाल्यामुळेच अतिउत्साहाचे गालबोट लागते. येणारे सर्व उत्सव असो किंवा सार्वजनिक समारंभ असो त्यावर या अतिउत्साहाचा परिणाम होणार नाही आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी. कोणत्याही उत्सवामुळे वातावरण प्रसन्न व्हायला हवे मात्र प्रदूषित होऊ नये ही साधी गोष्ट लक्षात घ्यायला हवी.