नगर, (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर मतदारसंघात 61 तर शिर्डी मतदारसंघात 62 टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केला. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का सर्वच विधानसभा मतदारसंघात वाढला आहे. मात्र, अधिकृत आकडेवारी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने अंदाजे मतदानाची टक्केवारी स्पष्ट करण्यात आली आहे.
दरम्यान उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. ते आता 4 जूनला कळणार असल्याने तोपर्यंत उमेदवारांचे देव पाण्यात राहणार असल्याचे दिसत आहे.
पारनेर, पाथर्डी, शिर्डी येथील घटना वगळता अन्यत्र मतदान शांततेत झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. मात्र काही मतदान केंद्रात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
त्यामुळे ईव्हीएम मशीन तालुकास्तरावर आणणे व तेथे नगरला वखार महामंडळाच्या गोदामात मशीन आणण्यास विलंब होणार आहे. निवडणुकी दरम्यान नगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळ्या रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवडणुकी दरम्यान अशा किरकोळ घटना वगळता नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिली.
रात्री उशिरापर्यंत सुरु होते मतदान
लोकसभेच्या मतदानासाठी सकाळी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. मात्र दुपारनंतर मतदानाचा वेग मंदावला होता. उन्हामुळे मतदार घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत होते.
सायंकाळी अनेक अचानक मतदान केंद्रात गर्दी वाढल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते. पारनेर तालुक्यातील भाळवणी, सुपा शहर, भोयरा गांगर्डा येथे मतदान सुरु होते. तर राहुरी तालुक्यातील वळण, वांबोरी ही मोठी गावे असून या ठिकाणीही सायंकाळी मतदार मतदानासाठी उशिरा बाहेर पडले. तसेच कर्जत, शेवगाव तालुक्यात काही मतदान केंद्रात मतदान सुरु होते.