नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेला शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आता जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. हॉलिवूडची पॉप सिंगर रिहाना हीने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने तिला प्रत्युत्तर दिलं. कंगना पाठोपाठ देशातील सेलिब्रेटींनी रिहानाला धारवेर धरण्याचा प्रयत्न करत #IndiaTogether मोहीम चालवली. ही मोहीम चालवणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील खेळाडूंचा समावेश होता. मात्र या सेलिब्रेटींनी केवळ भीती आणि दबावामुळं सरकारसाठी ट्विट केल्याचा दावा दिग्गज अभिनेते आणि काँग्रेसनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे.
रिहानाच्या ट्विटनंतर कंगनासह अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगन यांनीदेखील रिहानाच्या ट्विटवर टीका करत भारताची एकता आणि अखंडता नेहमी अबाधित आहे आणि राहील, असा संदेश दिला. तर क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, शिखर धवन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी सरकारचे समर्थन करत ट्विट केले. मात्र अभिनेत्री तापसी पन्नू हिने #IndiaTogether मोहीम चालविणाऱ्या सेलिब्रेटींना चांगलेच फटकारले.
सेलिब्रेटींच्या भूमिकेवर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र अनेकजण भीती, दबावासमोर हार मानून भूमिका घेत आहेत. सरकारचं समर्थन करणाऱ्या सेलिब्रेटींनी काही दिवस आधीच भूमिका घेतली असती बर झाल असतं. मात्र सरकारच्या दबाला बळी पडणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की, कधी तर सरकार बदलणार आहे, असंही सिन्हा यांनी म्हटले.
तापसी पन्नूच्या ट्विटवर सिन्हा म्हणाले की, तापसी एक स्वाभिमानी मुलगी आहे. कलाकारांनी किंवा खेळाडूंनी केवळ सरकारची बाजू घेऊ नये. लॉकडाऊनमधील प्रवासी कामगारांप्रमाणे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.