वानवडी, दि. 3 (प्रतिनिधी) -वानवडीकडून फातिमानगर चौकातील रस्त्यावर हडपसरकडे जाण्यासाठी वाहनचालक विरूद्ध दिशेने वाहने नेतात. त्यामुळे या चौकात अपघात होत आहेत. येथील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई कधी होणार? वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष का करतात? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
वानवडी येथील फातिमानगर चौकातून भैरोबा नाला, हडपसर, रेस कोर्स, पुणे शहराकडे जाण्यासाठी मोठी वाहतूक होते. वानवडीकडील बाजूचा रस्ता अरूंद असल्याने या रस्त्यावरून बस, टेम्पो या सारखी मोठी वाहने ये-जा करत असताना वाहतूक कोंडी होते.
फातिमानगर येथे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चौकात सिग्नल आहे. तरीही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्या सुमारास समोरून हडपसरकडून-जांभुळकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनास धडक बसून अपघाताचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या चौकात विरुद्ध दिशेने वाहने चालवत असणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.