कराड – सध्या जागतिक बाजारामध्ये साखरेला भाव चांगला आहे. त्यामुळे ऊसाला चालू गळीत हंगामासाठी एक रकमी एफआरपी अधिक 1 हजार रुपये देणे सहज शक्य आहे. परंतु, कारखानदार शेतकऱ्यांच्या असंघटीतपणाचा फायदा घेत असून शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटीत होऊन ऊस दरासाठी उठाव करावा, असे आवाहन संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले.
पाचवडेश्वर ता. कराड येथे रविवारी 2 रोजी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित “पहिली ऊस परिषद’ पार पडली. याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बी.जी. काका पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, उपाध्यक्ष उत्तम खबाले, पंढरपूर प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसनराव खोचरे, माढ्याचे राजेंद्र डोके, सोलापूर उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, सांगली जिल्हाध्यक्ष अशोक सलगर, पाटण तालुकाअध्यक्ष शंकर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पंजाबराव पाटील म्हणाले, मागील 5 वर्षांमध्ये ऊसाचा भाव एक रुपयाही वाढला नसून उत्पादन खर्च मात्र दुपटीने वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उसाला जोपर्यंत कारखानदार एक रकमी एफआरपी जाहीर करत नाहीत; तोपर्यंत उसाला तोडी घ्यायचा नाहीत. हा निर्णय येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. तरच आपल्या मागणीप्रमाणे येणाऱ्या गळीत हंगामात प्रति टन 4 हजार रुपये भाव मिळेल. तसेच शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेऊन उस तोडी संदर्भात निर्णय घ्यावा, असे आवाहनही पंजाबराव पाटील यांनी केले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बी.जी. काका पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतीसाठी कर्ज अन् कर्ज फेडण्यासाठी शेती
शेतकऱ्याला शेती करायला कर्ज काढावे लागते. तसेच ते कर्ज फेडण्यासाठी शेती करायची? शेतकऱ्यांची ही अवस्था कित्येक वर्षांपासूनची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटीत होऊन उठाव न केल्यास पुढेही हे असेच चालू राहणार आहे. यात बदल घडवायचा असेल, कायमस्वरूपी कर्जमुक्त व्हायचं असेल, सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगायचे असेल, तर येणाऱ्या काळात बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस दरासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असेही पाटील यांनी केले.
एक तोळा सोने; पंधरा टन ऊस
1967 साली ऊसाचा टनाला भाव 204 रुपये होता. त्यावेळेस एक तोळा सोन्याची किंमत 200 रुपये होती. आता एक तोळा सोने घेण्यासाठी पंधरा टन ऊस घालून सुद्धा एक तोळा सोने घेता येत नाही. याचा विचार शेतकऱ्यांनी करायचा आहे.
ऊस परिषदेत मंजूर झालेले ठराव
येत्या गळीत हंगामासाठी ऊसाला एक रकमी एफआरपी अधिक 1 हजार रुपये असा प्रति टन 4 हजार रुपये दर जाहीर करावा, ऊस वजनकाटे अद्यावत व सीसीटीव्ही युक्त असावेत, शेतकऱ्यांना दिवसा 10 तास मोफत वीज द्यावी, सरकारने उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के नफा या धर्तीवर शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, एफआरपीचा पूर्वीप्रमाणे 8.5 टक्के बेस करण्यात यावा, नवीन साखर कारखान्यासाठी अंतराची अट रद्द करावी, प्रमुख ठराव ऊस परिषदेत एकमुखाने मंजूर करण्यात आले.