हिंगोली – मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसाने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान, परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि गाडीसाठी घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वडहिवरा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. दत्तराव आनंदराव गडदे (वय, 35 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
शेतकरी दत्तराव गडदे यांनी सात लाख पन्नास हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिक हातचे गेले आता कर्ज कसे फेडायचे यामुळे ते नेहमीच ताणतणाव राहत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतात जाऊन विषारी पावडर खाल्ल्याने आज दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे एक मुलगी, एक मुलगा व पत्नी आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.