नारायणगाव – ऊस बिलातून पाणीपट्टी वसूल करण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे. साखर कारखान्यांनी ऊस बिलातून पाणीपट्टी कपात करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी केले आहे. पाटबंधारे विभागाने गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीपट्टीमध्ये 6 पट वाढ केली असून पूर्वी सहाशे रुपये पाणीपट्टी आकारली जात होती, परंतु शासनाच्या नवीन जीआरनुसार येथून पुढे एकरी 4 हजार 200 रुपये पाणीपट्टी आकारली जाणार असल्याने पाणी पट्टीत सहापट वाढ करण्यात आली आहे.
पाटबंधारे विभागाने साखर कारखान्यांच्या माध्यमातून पाणीपट्टी वसुलीचा तगादा लावला आहे. कारखान्यांनी शेतकर्यांकडून पाणीपट्टी वसूल करावी यासाठी पाटबंधारे विभागाने साखर कारखान्यांना पत्र व्यवहार केला आहे. पाणीपट्टी सक्तीने वसुल करण्यास शेतकर्यांचा तीव्र विरोध असून साखर कारखाना शेतकर्यांच्या मानगुटीवर बसून शासनाची वसुली करून देणार असेल तर संबंधित कारखान्यांवरती आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील शेतकर्यांनी वाढीव पाणीपट्टीचा एकही रुपया भरायचा नसून फक्त मूळ पाणीपट्टी शेतकर्यांनी भरावी, असे आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. तसेच वाढीव पाणीपट्टी भरण्यासाठी विरोध असल्याचे शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष तानाजी बेनके, शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे, तालुकाध्यक्ष जुन्नर आघाडी शेतकरी संघटना प्रमोद खांडगे यांनी सांगितले आहे.
“श्री विघ्नहर कारखान्याला पाणीपट्टीत वाढ झालेली माहिती नसल्याने एका पंधरवड्यात कपात करण्यात आली; परंतु पाणीपट्टीत वाढ झालेली समजल्यावर कपात केली नाही व करणार नाही.”- सत्यशील शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर सहकारी साखर कारखाना