वेदनेत जन्मे हरी संकटात रांगे, हा अभंग वास्तव रूप दर्शवतो. कृष्ण आणि वेदना ह्याचं जवळचं नातं असावं. कृष्ण म्हणजे त्याग हे समीकरण आहेच. थोड वेदने पलीकडे काय होत असेल, मनाच्या पातळीवर असा विचार आला. वेदनेतूनच जन्माला आलेली संवेदना म्हणजे जखम. जखम वेदनेचीच जुळी बहीण तर नसेल, असेही मनात आले, दोघीही परस्परपूरक.
वेदना त्या क्षणापुरती निर्माण होते, कुणी आपल्या मनाविरुद्ध वागले तर आपण दुखावतो. अपेक्षांचं ओझं असतं ना मनावर, मग होतात जखमा. ही संवेदना जखमेच्या रूपात मनात कुठेतरी शिल्लक राहते. जखमा काही लगेच भरणार्या, तर काही आयुष्यभर मिरवाव्या लागलेल्या, अंतिम टप्प्यापर्यंत सोसाव्या लागलेल्या. कधी कधी एखाद्याचं विव्हळणही बेवारशी करणार्या जखमा.
जखमा मनाच्याच असतात असे नाही. शारीरिक व्याधीतून निर्माण झालेल्या ज्या उपचाराने बर्या होतातही, तरी आपल्या खुणा सोडतातच. त्यातून होणार्या वेदना कालबाह्य होतात. वेदना ह्या तात्पुरत्या कधी कधी आपल्याच मनाच्या, तर कधी इतरांनी दिलेल्या असतात जखमा. त्या वेदनांची दाहकता किती घ्यायची हे विचारप्रक्रिया ठरवते. व्यक्तिजन्य जखमा, त्या जखमा वरवरच्या की खोलवर हे आपल्या विचारावरच ठरते. त्यातील वेदना संपल्या तरी त्याच्या खुणा आपली ओळख कधीच पुसत नाहीत.
आपल्या चेहर्यावर वयानुसार कितीही सुरकुत्या पडल्या तरी मूळ चेहर्याचे स्वरूप त्या काळ पुरुषालाही बदलता आले नाही. तशाच जखमा… माफीच्या जाणिवेतून क्षमतेच्या रूपात विरून जात नाहीत, तर त्यातील वेदनेची दाहकता कमी होते इतकेच. म्हणून तर ‘शब्द जपावा बोलण्याआधी’. गेलेले शब्द परत येत नाहीत. ते जिव्हारी लागत त्याच्या जखमा होतात आणि त्या आपले अस्तित्व दाखवतातच.
आयुष्यात असे अनेक संघर्षाचे प्रसंग येतात कधी व्यक्तीमुळे, नातेसंबधामुळे. यातून कधी व्यक्त तर कधी अव्यक्त वेदना जखमा देऊन जातात. शेवटी माणसाला मन आहे. त्यात भाव भावना आहेत, कटू गोड विचारांची झालर त्या मनाला आहेच. विकारांची छिद्र त्या मनाला एकसंघ राहून देत नाहीतच. आयुष्याच्या संध्याकाळी अवलोकन करताना कळते वेदना किती बोथट झाल्या. आता जखमावर मी आरूढ झालेय. अनुभवाने समृद्ध झाले.