शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूरचा ‘जर्सी’ हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केलं आहे. हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली नाही. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा ‘कौन प्रवीण तांबे’ हा सिनेमा 2022 मध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
रणवीर सिंहच्या ‘83’ सिनेमाचे कथानक 1983 च्या विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केलं आहे. सिनेमात रणवीर सिंहने कपिलदेव यांची भूमिका साकारली आहे. ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा 2017 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा जेम्स अर्सकिनने सांभाळली होती. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात धोनीचे पात्र सुशांत सिंहने साकारले होते. या सिनेमामुळे सुशांत सिंहला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. 2005 साली प्रदर्शित झालेला ‘इकबाल’ हा क्रीडाविषयक सिनेमा आहे. या प्रेरणादायी अशा चित्रपटात श्रेयस तळपदे एका कर्णबधीर आणि मूक मुलाच्या भूमिकेत आहे. तो सर्व अडथळ्यांवर मात करून क्रिकेटर बनतो. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ हा बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील हा चित्रपट एका लहानशा गावाभोवती फिरतो, ज्यामध्ये भुवन (आमीर खान) नावाचा एक तरुण ब्रिटिश अधिकार्यांशी क्रिकेट खेळण्याबाबत आव्हान स्वीकारतो.
कुणाल देशमुख दिग्दर्शित ‘जन्नत’ हा सिनेमा 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. क्रिकेट सामन्यांवर लागणार्या सट्टेबाजीवर हा सिनेमा आधारित आहे. ‘अजहर’ हा सिनेमा माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर आधारित आहे. या सिनेमात इमरान हाश्मी आणि प्राची देसाईची जोडी होती. सोनम कपूर आणि दुल्कर सलमान यांची भूमिका असलेला ‘झोया फॅक्टर’ हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे. ‘काय पो छे’ या चित्रपटातून 2001चा गुजरात भूकंप आणि 2002 च्या गोध्रा दंगली दरम्यानची तीन मित्रांची कथा यामध्ये आहे. या कथेच्या पार्श्वभूमीला क्रिकेट आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक आर बाल्की यांच्या ‘घुमर’ या चित्रपटात एक नवोदित फलंदाज अनिना असते. भारतासाठी खेळण्याचं तिचं स्वप्न असतं. स्थानिक पातळीवरील तिच्या दमदार खेळीमुळे तिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड होते; परंतु तिच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येतं. अपघातात तिला उजवा हात गमवावा लागतो. त्यामुळे आता आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही, असं तिला वाटू लागतं. ती निराशेच्या गर्तेत जाते. माजी क्रिकेटपटू पदमसिंग सोधी ऊर्फ पॅडी (अभिषेक बच्चन) यांना भेटते. निराशेच्या गर्तेत गेलेल्या अनिनाला पॅडी सर पुन्हा स्वप्न दाखवतात. अपंगत्व येऊनही भारतीय महिला संघात तू खेळशील, अशी आशा दाखवतात.
आता तुम्ही म्हणाल, ती तर फलंदाज होती. केवळ डाव्या हातानं ती जागतिक पातळीवर राष्ट्रीय संघात फलंदाजी कशी करणार? इथून खर्या अर्थानं ‘घुमर’चं कथानक वळण घेतं. माजी फिरकी गोलंदाज असलेला पॅडी आता अनिनाला गोलंदाज होण्यासाठी प्रशिक्षण देतो. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे पॅडी दुखावलेला असतो; परंतु त्याच्या वैयक्तिक संघर्षाला आपली ताकद बनवून तो अनिनाला प्रशिक्षण देण्यास सुरुवात करतो. अनिनाच्या खेळीत त्याला स्वतःचा विजय दिसत असतो. अनिनाला डावखुरी फिरकीपटू म्हणून घडविण्याचा प्रवास म्हणजे ‘घुमर’ आहे. या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते.
‘शाबाश मिठू’ हा एक विशेष चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात तापसी पन्नू बरोबर अभिनेते विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया अवोन हेदेखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज तसेच महिला क्रिकेट संघाच्या आयुष्याभोवती फिरणारा आहे. मिताली राजने तिच्या कारकिर्दीत अनेक चढउतारांचा सामना केला, पण तिने कधीही हार मानली नाही. चार विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून, तिने स्वत:ला सिद्ध केले आहे, अशी गोष्ट या चित्रपटातून मांडली आहे.
भारतात सर्वाधिक चालणार्या इंडस्ट्री कोणत्या असतील तर त्या आहेत बॉलीवूड आणि क्रिकेट. या दोन्ही क्षेत्रांमध्ये पैसा आणि प्रसिद्धी भरपूर प्रमाणात आहे. या क्षेत्रांमध्ये सेट झालेल्या माणसाला पैसा आणि प्रसिद्धी भरपूर मिळते. त्यामुळे सध्या आपल्या देशात सुरू असणार्या ‘आयपीएल’ क्रिकेट फिव्हरमध्ये क्रिकेटवर असणार्या या चित्रपटांचा आनंद द्विगुणित करणारा आहे.
बॉलीवूड आणि क्रिकेटचं 70च्या दशकापासून नातं आहे. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्यापासून ही सुरुवात झाली. 90च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जाहिरातीच्या व शूटिंगदरम्यान अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी यांची भेट झाली. पुढे त्यांच्या गाठीभेटी वाढत गेल्या. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 1996 मध्ये लग्न केले. त्यानंतर अलीकडच्या काळातही हा ट्रेंड चालूच आहे. युवराज सिंगने अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले. भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानने अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न केले. हरभजन सिंगसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री गीता बसरा हीसुद्धा फिल्मी जगापासून दुरावली तसेच हार्दिक पंड्यासोबत लग्न केल्यानंतर नताशा स्टॅनकोविकही चित्रपटांपासून दूर आहे.
2013 साली भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या आयुष्यात अनुष्का शर्मा आली आणि दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. जवळपास चार वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर विराट-अनुष्का विवाहाच्या बंधनात अडकले. भारताचा फलंदाज लोकेश राहुल अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत विवाह बंधनात अडकला. अशा अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आणि सुखानं संसार केला, अर्थात सर्वांचीच नाती यशस्वी ठरली नाहीत. काही नाती तर लग्नाच्या उंबरठ्यावर जाण्याआधीच तुटली. पण एक गोष्ट मात्र नक्की, की या जोड्यांच्या अवतीभवती प्रचंड लाइमलाइट व लोकप्रियतेचे वलय होते आणि आजही आहे. पण त्याची दुसरी बाजू अशी, की जेवढी त्यांना लोकप्रियता मिळते, तेच या अभिनेत्री क्रिकेटपटूंना ट्रोलिंगचं शिकार व्हावे लागले आहे.
अलीकडे जेव्हा एखादा क्रिकेटपटू मैदानावर अपयशी ठरतो आणि त्याची बायको अथवा गर्लफ्रेंड ही अभिनेत्री असेल, तर त्याच्या अपयशाला तिला जबाबदार ठरवलं जातं. इतकंच नाही तर सोशल मीडियावर तिच्यावर यथेच्छ खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. अलीकडेच विराट-अनुष्का, राहुल-अथिया, हार्दिक पंड्या-नताशा या जोड्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आलं, जे योग्य नाही.