Maratha Reservation : राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर आता याबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. खुल्या वर्गातील गुणवंताच्या जागा टिकवणं ही माझ्यावर जबाबदारी असल्याचे मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केलं आहे.
जरांगे यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली. सरकाराने जारी केलेल्या अध्यादेशावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची संरक्षणाची जबाबदारी जयश्री पाटील आणि माझी आहे असं सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मराठ्यांना कुणबीप्रमाणपत्रावर ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी अडचणीचे ठरत असलेल्या सगे सोयरे संबंधीचे परिपत्रक सरकारने रात्री उशीरा काढले आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण आणि आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. यावर देखील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे.
सगे सोयरे याचा अर्थ काय? रक्ताचे नाते म्हणजेच सगेसोयरे यात नविन काही नाही. किती जणांना 37 लाख प्रमाणपत्रे मिळाली ? हे नोटीफिकेशनही कोर्टात टीकणार नाही. याची कोणती मागणी मान्य झाली आहे. 307 सारखे गुन्हे मागे घेता येऊ शकतात? एसटी सारखी सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीवर सुप्रीम कोर्टाचे काय आदेश आहेत असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे.
सदावर्ते यांनी खरंच उपोषण केले असेल तर त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी आणि सर्वांना आपआपल्या घरी शांततेत जावू द्यावे आणि सोमवारी कोर्टात सर्वबाबी स्पष्ट होतील तोपर्यंत वाट पाहावी असेही ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.