पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी) -दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. पाच दिवसांच्या या दिवाळीत प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. काळाच्या पडद्याआड जात असली तरी “केरसुणी’ अर्थात “लक्ष्मी’ला आजही मागणी कायम आहे. त्यामुळे केरसुणी बनविण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू असून करोनानंतर होणाऱ्या दिवाळीकडून या कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
केरसुणी घरात आल्यानंतर त्याची हळदी-कुंकूने पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यामुळेच आधुनिकीकरणाकडे वळत असताना पारंपरिक पद्धतीने बनविल्या जात असलेल्या झाडू व्यवसाय अजूनही टिकून आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी लागणारी केरसुणी बनविणाऱ्या कारागिरांची लगबग सुरू आहे. काळाच्या ओघात कुंचिकोरवा समाजातील पारंपरिक व्यवसाय मागे पडत चालला असला तरी लक्ष्मी पूजनाला केरसुणीला आजही मान आहेत. वेताळनगर येथे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कुटुंबीय हा पारंपरिक व्यवसाय करत असल्याचे लक्ष्मी कुंचिकोरवे यांनी सांगितले.
योग्य किंमत मिळावी
पूर्वी पुनावळे, किवळे परिसरात शिंदीची झाडे होती. आता ती नष्ट होत असल्याने शिंदीच्या झाडाच्या झावळ्याही विकत आणाव्या लागतात. तसेच केरसुणी बनविण्यासाठी अपार मेहनत घेऊनही त्याला योग्य किंमत मिळत नाही. तसेच शिंदीच्या झावळ्यापासून एक केरसुणी बनविण्यासाठी किमान आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, त्याचा योग्य मोबदला मिळत नाही, अशी खंत कारागिरांनी व्यक्त केली. तसेच यंदा करोनानंतर दोन वर्षांनी दिवाळी साजरी होणार असल्याने किमान चांगली कमाई होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.