पाथर्डी – तालुक्यातील माणिकदौंडी रस्त्यावरील केळवंडी शिवारात इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टॅंकर पलटी होऊन पेटलेल्या टॅंकरमधील दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याघटनेत टॅंकर पूर्णतः आगीच्या विळख्यात सापडला. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
या आगीत गणेश रामराव पालवे (वय 42 रा.पालवेवाडी), सुरैया बशीर शेख (वय 46 रा. माळी बाभूळगाव ता.पाथर्डी)असे दोन जण जळून मृत झालेल्याचे नावे आहेत. तर लहू सांडू पवार (वय 53), सुमन लहू पवार (वय 49), जगदीश जगन पवार (वय 3), कोमल जगन पवार (वय 7 सर्व रा. विसरवाडी ता.पैठण) व टॅंकरचालक दादासाहेब केकाण (रा.पालवेवाडी) असे पाच जण जखमी झाले आहेत.
गणेश पालवे हा या टॅंकरचा दुसरा चालक असून गणेश हा टॅंकरच्या डाव्या बाजूला बसलेला होता. त्याच बाजूने टॅंकर पलटल्याने तो टॅंकर खाली सापडला.त्यामुळे चेहरा जळाला नाही मात्र उर्वरित शरीर आगीमध्ये जळून खाक झाले आहे. तर महिला पूर्णतः जळून खाक झाली. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराला माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला वळणावर इथेनॉलने भरलेला टॅंकर उलटून अपघात झाला. त्यानंतर टॅंकरमधील पाच जण सुखरूप बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले. गणेश पालवे व सुरैया बशीर शेख हे दोन जण टॅंकरमध्ये अडकल्याने त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. जखमींना पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलीस हवालदार नितीन दराडे, राम सोनवणे, अल्ताफ शेख, सुहास गायकवाड, किशोर लाड, प्रल्हाद पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून दोन तासांनी टॅंकरची आटोक्यात आणून आग विझवली. त्यानंतर पोलिसांनी आगीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटवून नावे निष्पन्न केले. दादासाहेब केकाण याने पाथर्डीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेतले असून त्याला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे.