पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदा घेण्यात येणारी “सीईटी’ मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा आदेश दिला आहे. दि. 21 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार होती. या निर्णयामुळे “कही खुशी, कही गम’ अशी अवस्था विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यात निर्माण झालेली आहे. दरम्यान, नामांकित महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी तीव्र स्पर्धाही लागणार आहे.
करोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा एकूण निकाल 99.95 टक्के एवढा लागला होता. शासनाने अकरावी प्रवेशासाठी “सीईटी’ घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेसाठी सविस्तर सूचना, अभ्यासक्रमही जाहीर झाला होता. “सीईटी’साठी 10 लाख 98 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणीही केली. यात 36 हजार विद्यार्थी हे सीबीएसईसह अन्य बोर्डाचे आहेत.
दरम्यान, उच्च न्यायालयात “सीईटी’बाबत याचिका दाखल झाली होती. त्यावर न्यायालयाने “सीईटी’ परीक्षा रद्द करत दहावीच्या गुणांच्या आधारावरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया येत्या सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देशही न्यायालयाने शासनाला दिले आहेत. या निर्णयाबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संघटना कडून मते जाणून घेण्यात आली. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी “सीईटी’ रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांनी “सीईटी’साठी नोंदणी करुन अभ्यासही सुरू केला होता. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करुन दहावीच्या निकालाच्या आधारेच अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने “सीईटी’बाबत न्यायालयात योग्य ती बाजूही मांडली होती. आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू व्हावी व प्रत्येकाला प्रवेश मिळावा, यासाठी नियोजन करावे लागणार आहे.
– वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
शासनाने दहावीची परीक्षा आधीच घेतली असती, तर “सीईटी’चा गोंधळ निर्माण झालाच नसता. मात्र, आता तातडीने दहावीच्या निकालानुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवून ती पूर्ण करावी. नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चूरस निर्माण होणार आहे.
– महेंद्र दाभाडे शिक्षक
राज्य शासनाने “सीईटी’बाबत सक्षमपणे बाजू मांडली नाही. त्यामुळे शासनाला न्यायालयाकडून दणका बसला आहे. विद्यार्थ्यांना “सीईटी’द्वारे गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी मिळणार होती. विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा अभ्यास केल्यामुळे ही परीक्षा झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांचे भवितव्यच अंधातरी राहिल्याची अवस्था निर्माण झालेली आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सतत धोरण बदलत असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे.
– प्रा.अविनाश ताकवले, अध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक सेल
उच्च न्यायालयाने “सीईटी’ रद्द करण्याचा घेतलेला निर्णय दिलासादायक आहे. राज्य मंडळाच्या निकालावर विश्वासासह विद्यार्थी, शिक्षक यांच्यावर विश्वास असलाच पाहिजे. विद्यार्थ्यांना पुढे करुन कोणाच्यातरी फायद्यासाठी करोना काळात “सीईटी’ घेणे अयोग्य ठरले असते. दहावीच्या निकालावरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविणे आता योग्यच ठरणार आहे.
– प्रा. संतोष फाजगे, सचिव, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ
दहावीची परीक्षा घेतली असती, तर अकरावी प्रवेशासाठीचा हा घोळ झालाच नसता. करोना प्रादुर्भाव असतानाही नियमांचे पालन करुन परीक्षा घेतल्याच पाहिल्या होत्या. आधी दहावी परीक्षा रद्द, त्यानंतर आता “सीईटी’ रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले आहे. विद्यार्थ्यांवर हे अन्यायकारकच आहे.
– एक पालक