पुणे -पीएच.डी. प्रबंधातील गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने महत्त्वाचे पाऊले उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पीएच.डी.चा दर्जा तपासण्यासाठी एक स्वतंत्र पडताळणी समिती नेमण्यात येत आहे. या उच्चस्तरीय समितीमार्फत पीएच.डी.चे प्रबंध तपासले जाणार आहे. या पडताळणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे “यूजीसी’ने म्हटले आहे.
“यूजीसी’चे अध्यक्ष प्रा. एम.जगदीश कुमार यांनी पीएच.डी. दर्जा सुधारण्याविषयी सविस्तर माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणा हे संशोधन केंद्रित असून, शोधनिबंधांचा दर्जा आणि पीएच.डी.ची विश्वासार्हता जोपासणे गरजेचे आहे. पीएचडी दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यासंदर्भात यूजीसीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातून सर्व बाबी समोर येतील, असेही प्रा. कुमार यांनी सांगितले.
जगदीश कुमार म्हणाले, देशातील 5 लाख मुले सध्या परदेशात शिक्षण घेतात. भविष्यात 20 लाख मुले परदेशात जातील. भारतात लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी विद्यापीठे, महाविद्यालये नाहीत. शैक्षणिक संस्थांमध्ये जागेअभावी मुलांना प्रवेश मिळत नाहीत. यामुळेच परदेशी विद्यापीठांना भारताची दारं खुली केली आहेत. परदेशी विद्यापीठे भारतात आली तर विद्यार्थ्यांच्या खर्चात बचत होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचा उल्लेख आहे. भारतीय शैक्षणिक संस्थांना परदेशात स्थापन व्हाव्यात यासाठी यूजीसीकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे.
यूजीसीकडून उच्च शिक्षणात बदल घडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविद्यालये, विद्यापीठांची गुणवत्ता उंचावण्यासाठी रॅंकिंगमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. त्याचे अपेक्षित परिणाम दिसून आले आहेत. अजूनही काही संस्थांकडून चूकीची माहिती देऊन चांगला दर्जा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी यूजीसीकडून कठोर नियमावली तयार करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई केली जात असल्याचे कुमार यांनी सांगितले.
नॅक मूल्यांकनात बदल
शैक्षणिक संस्थांच्या नॅक मूल्यांकनात बदल करण्याचा निर्णय यूजीसीने घेतला आहे. महाविद्यालयांना नॅकची श्रेणी देण्याऐवजी फक्त गुण (बायनरी सक्रेडिएशन) देण्याचा विचार आहे. नॅकचे 80 टक्के मूयांकन श्रेणीच्या आधारे केले जाते. परंतू, श्रेणीच्या आधारे केले जाणारे मुल्यांकनातून महाविद्यालयांची गुणवत्ता अधोरेखित होत नाहीत. याऊलट श्रेणीचे चुकीचे परिणाम दिसून आले आहे. त्यामुळे गुण देण्याचा विचार असल्याचे जगदीश कुमार यांनी सांगितले.