कोपरगाव – स्वत:चे घर असावे असे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. परंतु शहरात जागेचे भरमसाट दर व घर बांधण्यासाठी येणारा मोठा खर्च त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या घराच्या स्वप्नापासून कोसो दूर राहत आहे. अशा नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी ‘म्हाडा’ची योजना राबविणार असून, त्याबाबत नुकतीच ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या बेट भागातील सर्व्हे ५६मधील जागेची पाहणी केली आहे.
ही योजना शहरात, तसेच महापालिका क्षेत्रात व्यापक प्रमाणात राबविली जाते. त्याच धर्तीवर नगरपालिका क्षेत्रातही योजना राबवून कोपरगाव सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरात म्हाडाची योजना राबविण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.३०) शहरात येवून जागेची पाहणी केली. या जागेवर एकूण ३५० घरांची निर्मिती होऊन ३५० कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.
शहरात ‘म्हाडा’ची योजना राबविण्यात पुढाकार घेणारे आ. काळे एकमेव आमदार असून, हक्काच्या घरापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना परवडणारी घरे मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. या वेळी ‘म्हाडा’चे अधिकारी नितीन आव्हाड, महेश कडू, कोपरगाव नगरपरिषदेचे किरण जोशी, हर्षवर्धन सुराळकर, प्रवीण पठाडे, सचिन परदेशी, राजेंद्र जोशी, विलास आव्हाड, राहुल आव्हाड आदी उपस्थित होते.