मुंबई – महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशात कर्तबगार म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. अशा महत्त्वाच्या आणि राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा घाट घातला जातोय. हा प्रकार अंत्यत चुकीचा आणि राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचा, असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला.
शिपाई ते सहाय्यक निरीक्षक अशी 40 हजार 623 पदे मंजूर झाली आहेत. सदरील कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती करणे गंभीर व धोकादायक ठरू शकते असे सांगतानाच दानवे यांनी थेट रशियातील उदाहरण दिले. नुकतीच एक घटना अशा पद्धतीने रशियामध्ये घडली आहे. येथे वॅगनार नावाचा ग्रुप स्थापन झाला होता. रशियाच्या सरकारने या वॅगनार ग्रुपला प्रीगोझीन नावाच्या ईसामाच्या नेतृत्वाखाली खाजगी सैन्य निर्माण करण्याचे अधिकार दिले होते, त्याचे परिणाम आपल्या सर्वांच्या समोर आलेलेच आहेत.
दानवे पुढे म्हणाले की, उद्या भरती केलेल्या कंत्राटी पोलिसांनी सरकारचे आदेश मानण्यास नकार दिला, तर काय होईल? याचा विचार करा, असे आवाहन करत दानवे यांनी या खाजगी कंपनीकडून पोलिसांच्या होणाऱ्या भरतीला कडाडून विरोध दर्शवला. मुंबई पोलिसांमध्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचे धोरण राज्य सरकारने मंजूर केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. तीन हजार पोलिसांची पदे अकरा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.