राजगुरूनगर -काही लोक घरात बसून अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार माहितीसाठी पाठविलेल्या मंजूर कामांच्या याद्या जशाच्या तशा स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करून खोटे श्रेय लाटत आहेत. मी आजवर कधीही न केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी धडपड केली नाही.
मात्र, खोटं बोल पण रेटून बोल अशा स्वरूपाचे प्रकार सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला अनुभवायला मिळत आहे. मी प्रयत्नपूर्वक मंजूर केलेल्या कामांचे श्रेय लाटणाऱ्यांनी स्वतः केलेला पाठपुरावा लोकांसमोर उघड करावा, अन्यथा जनतेची जाहीर माफी मागावी, असा उपरोधिक टोला यावेळी शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता लगावला.
आढळाराव म्हणाले की, मागील वर्षी करोना, निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आंबेगावसह खेड तालुक्यातील गावांचा पाहणी दौरा केला होता. यावेळी नायफड, धाबेवाडी आदी भागातील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती दिली होती. तसेच रस्त्यांची ग्रामस्थांसोबत पाहणी करून तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चव्हाण, कार्यकारी अभियंता बाप्पा बहीर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या कामांचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना केल्या.
चव्हाण यांनी या कामांना राज्य शासनाने केंद्रीय मार्ग निधीतून शिफारस केल्यास मोठ्या प्रमाणात निधी मिळून दळणवळणाची समस्या दूर होऊ शकेल, अशी माहिती दिली. त्यानुसार वाडा, (ता. खेड) ते घोडेगाव (ता. आंबेगाव) प्रजिमा 12 रस्ता सुधारणा करणे 2 कोटी 72 लाख आणि प्रजिमा 31 डेहणे-नायफड-धाबेवाडी (ता. खेड) ते पोखरी (ता. आंबेगाव) रस्ता सुधारणा करण्यासाठी 1 कोटी 96 लाख रुपये या कामांचे प्रस्ताव बनविण्यात येऊन मंजुरीसाठी पाठविण्यात आले.
त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात समक्ष भेट घेऊन व पत्रव्यवहार करीत या दोन्ही कामांना प्राधान्याने निधी मंजूर व्हावा, अशी मागणी केली. मंत्री शिंदे यांनी ही मागणी तात्काळ मान्य करत या कामांचा समावेश राज्याच्या केंद्रीय मार्ग निधीतील कामांमध्ये करून दि. 4 फेब्रुवारी रोजी केंद्र शासनाकडे शिफारस प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावाला मंजुरी मिळून त्याद्वारे वरील दोन्ही कामांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय निधीतून 4 कोटी 69 रुपये निधी मंजूर केल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदार नसलो तरी देखील ग्रामस्थांनी कामे मार्गी लावण्यासाठी आग्रही मागणी केली होती. या कामांसाठी घेतलेले कष्ट, पाठपुरावा येथील लोकांनी जवळून पहिला असून, ही दोन्ही कामे कोणामुळे मंजूर झाली हे सर्वांना चांगलेच माहीत आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार