मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास ;प्रसंगी भेदू वज्रास ऐसे
हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग कधीही ऐकला की डोळ्यासमोर धनंजय जाधव सर यांची छबी उभी राहते. पत्रकार म्हणून अनेक अधिकारी संपर्कात येतात आणि बदली झाली की विस्मृतीत जातात. पण, जाधव सर मनात रुजले, हृदयात वसले ते कर्तव्य कठोर असूनही माणूसपण जपणारं हळवं व्यक्तीमत्व होते म्हणून…
खरे तर जाधव सर पुण्यात आले, त्यावेळी अनामी रॉय यांनी पुणे पोलिसांची खालावलेली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर कळस धनंजय जाधव सरांनी चढवला. तेलगी मुद्रांक शुल्क घोटाळ्याच्या तपासावर विविध बातम्यांनी पोलिसांच्या विश्वासाहर्तेवर सामान्य माणसांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ते पुसून पुणे पोलीस म्हणजे कर्तव्यतत्पर आणि कायद्यापुढे सारे समान आहेत, अशी प्रतिमा निर्माण करण्यात जाधव सर यशस्वी झाले, याचा वार्तांकन करणारा पत्रकार म्हणून मी साक्षिदार आहे.
अधिकारी कर्तव्य कठोर असेल तर तो प्रसिध्दी लोलूप असतो, भ्रष्ट अधिकारीही पत्रकारांना हाताशी धरून असतात. पण जाधव सरांनी या गोष्टी कधी केल्या नाहीत. हे त्यांचे वेगळेपण त्यांची योग्यता जाणून घेण्यास पुरेसे ठरावे.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एका कार्यक्रमात धनंजय जाधव पुण्याचे आयुक्त म्हणून येतील असे सांगितले होते. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे त्यासंदर्भात चौकशी केली असता, त्यांनी त्यास दुजोराही दिला. पण, जाधव सर यांच्या बदलीचे आदेश निघायला विलंब झाला. 19 फेब्रुवारीला त्यांनी पुण्याच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांना भेटल्यानंतर पुण्याला योग्य आयुक्त मिळाल्याची खात्री पहिल्या भेटीतच पटली.
जाधव सरांचे खरे अधिकारीपण पाहिले ते 2006 च्या गणेश विसर्जन मिरवणुकीत. रात्री दहा नंतर लाऊडस्पिकर बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. पण, त्या विरोधात प्रभात फेऱ्या आणि निषेध सभा घेत ठराविक विचारसरणीच्या लोकांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यावेळी लाऊडस्पीकर सुरू ठेवल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे व्यवहार्य होते पण, ते कायद्याला धरून नव्हते. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय त्यांनी शिरोधार्य मानला.
त्याचा परिणाम म्हणून अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत दंगल घडवण्यात आली. मात्र खुद्द जाधव सर दंगल सुरू असणाऱ्या अलका टॉकिज चौकात आले. तेथे लाखोंच्या घरात असणारी गर्दी आणि सुरू असणारी दगडफेक पाहून त्यांनी लाठीमाराचे आदेश देत काही मिनिटात परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेक सुरू असणाऱ्या ठिकाणावर मध्यात उभे राहून लाठीमाराच्या आदेशावर सही केली. एक अधिकारी म्हणून त्यांनी त्यांचे कर्तव्य केले. पण त्याच बरोबर दंगलीच्या पाऊलखुणा पाहून दंगल घडू शकते हे लक्षात घेऊन त्यांनी पेटवलेली वाहने आणि राडारोडा पुढच्या अर्ध्या तासात हलवला. नव्याने येणाऱ्याला काल काही घडले होते याचा मागमूसही लागू दिला नाही. यावेळी खरे तर त्यांच्या मोटारीवरही दगडफेक झाली होती. उपायुक्त अशोक धिवरे जखमी झाले होते. पण म्हणून या कारवाईत अटक झालेल्यांना त्यांनी बदला घेण्याच्या भावनेने वागवले नाही. याऊलट त्यांचे समुपदेशन करून कायद्याची जरब बसवताना बळाचा अतिरेकी वापर आवश्यक नसतो, हेही जाणवून दिले. त्यामुळे यातील अनेक जण त्यानंतर कायद्याचा आदर करू लागले याचा प्रत्यय आम्ही पाहिला आहे.
पोलिसांना कर्तव्यावर लक्ष केंद्रीत करायचे असेल तर त्यांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळायला हवे, हे लक्षात घेऊन पोलीस पब्लिक स्कूलच्या विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. त्या शाळेमधील छोट्या मोठ्या कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावत असत. शाळेला वलय प्राप्त करून देणे हाच त्यामगचा मुख्य हेतू होता. त्या शाळेचा “कोटी मोला’चा एक मजला त्यांनी जनतेच्या सहभागातून उभा केला. अभिनेते नाना पाटेकर यांनी जाधव सरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 10 लाख रुपयांची मदत केली. हे सर्व करत असताना त्याची “बातमी’ करून प्रसिध्दी मिळवण्याचा सोस त्यांनी बाळगला नाही. उलट, अरे हे घरचे काम आहे. त्यात छापायचे काय? याऊलट पोलीस चुकत असतील तर ते छाप. आमच्यात सुधारणा तरी होईल, असे ते हसत हसत सांगत असत.
अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले कामधंद्या निमित्त अन्य शहरांत अथवा देशांत स्थीरावलेली आहेत. अशा एकारलेपण सोसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ख्याली खुशाली विचारण्यासाठी आणि त्यांना काही अडचण असल्यास ती सोडवण्यासाठी महिना पंधरा दिवसातून एखादा पोलीस त्यांच्या घरी पाठवण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. एकटे आहेत म्हणून ज्येष्ठांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड आपोआप झाला. मला आठवतंय, ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेऊन सुरक्षिततेच्या साध्या उपाय योजना त्यांनी समजावून सांगितल्या होत्या. टोमण्यांसाठी प्रसिध्द असणाऱ्या सुमारे दोन अडीच हजार पुणेरी ज्येष्ठांना सामोरे एकमेव आयुक्त म्हणून ते नोंदले जातील. पण मुख्य म्हणजे अनुभवसंपन्न जेष्ठांना सन्मानेच वागवले पाहिजे हा संदेश पोलिसांना आणि पुणेकरांना दिला गेला. तो पुरेसा परिणामकारक होता.
माणमध्ये एम. आय डी. सीच्या भू संपादनास त्या भागातील ग्रामस्थांनी 2007 मध्ये जोरदार विरोध सुरू केला. ग्रामस्थांनी गोफणीतून पोलीस आणि मोजणी अधिकाऱ्यांवर दगडफेक करून त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली. त्या बैठकीत एम. आय. डी. सी.च्या आवश्यकतेवर सर्वांनीच भर दिला. मात्र जाधव सरांनी खासगी प्रकल्पासाठी बळाचा वापर करण्यास विरोध केला. रेल्वे, पाणी अशा सार्वजनिक कामांसाठी बळाचा वापर करता येऊ शकेल. मात्र, खासगी प्रकल्पासाठी त्याचे समर्थन होऊ शकत नाही, ही त्यांची भूमिका विलासराव देशमुख यांनी मान्य केली. केवळ तार्किकदृष्ट्या योग्य भूमिका त्यांनी मांडली एवढेच मर्यादित महत्व याला नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत नाव असताना सरकारला कटू सत्य ऐकवण्यासाठू धैर्य लागते. ते धैर्य जपलेल्या माणुसपणातून येते. म्हणून हे माणूसपण मनात घर करून राहते.
राज्य लोकसेवेतून अधिकारी बनलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलेली ही घटना… “” “”मुलाखतीला खरे तर मी गोंधळून गेलो होतो. ग्रामीण भागातून आल्यामुळे गांगरलो होतो. पण माझी मानसिक अवस्था ओळखून जाधव सर मला म्हणाले, “शांत हो! थोडं पाणी पी. मग उत्तर दे. मुलाखत सुरू करू.’ या प्रेमळ स्वरांनी मी सावरलो गेलो आणि मुलाखत देऊ शकलो.
माणसं आभाळाएवढी वाटायला लागतात ती यामुळं. ही आभाळाएवढी माणसं आपलं माणूसपण जपून ठेवतात तेंव्हा ती हृदयात कायमचं स्थान मिळवतात. बाकीचे येतात आणि विस्मृतीत जातात. कामावर नितांत श्रध्दा आणि आपण माणूस आहोत, हे न विसरणं हे तुमचे आदर्श आजही लख्ख समोर आहेत.
सर, लिहायचे खूप आहे. लिहण्यासारखं खूप आहे. पण शब्द झाले माझे मुके… अशी माझी अवस्था आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या स्मृतींना श्रध्दांजली वहात इथंच थांबतो.
– मिथिलेश जोशी