– वंदना बर्वे
‘भाजपा के तीन काम- बैठक, भोजन और विश्राम’ ही भाजपची एकेकाळची ओळख होती. मात्र, सध्या सुस्ती स्फूर्तीत बदलली आहे. कोणत्याही निवडणुकीची घोषणा झाली तरी भाजपच्या उमेदवारांची यादी तयार असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मधील पक्षाचा विजय कसा असावा? याची जाणीव पदाधिकार्यांना करून दिली आहे. 2019 चा रेकॉर्ड मोडला पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. याचा अर्थ असा की, 303 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य पंतप्रधानांनी निश्चित केले आहे. शिवाय, 2024 मधील लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, मिझोरम आणि छत्तीसगड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर लोकसभेच्या निकालाचा गुणाकार-भागाकार करायला राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी देशातील 28 विरोधी पक्षांनी केलेली आघाडी अद्याप आकार घेऊ शकलेली नाही. मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी हा मुद्दा रेटून लावला. याचा परिणाम असा झाला की, लोकसभा आणि राज्यसभेचे 146 खासदारांना निलंबित करण्यात आले. यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे पित्त खवळले नसते तरच नवल!
या एका मुद्द्यामुळे तमाम विरोधी पक्ष पुन्हा एकजूट व्हायला लागले आहेत. ‘इंडिया’ आघाडीची चौथी बैठक दिल्लीत नुकतीच पार पडली हे खरं असलं तरी नेत्यांची मने जुळल्यासारखी स्थिती अजूनही दिसून येत नाही. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविणे या मुद्द्यावर जरी ही आघाडी अस्तित्वात आली असली तरी मुख्य हेतू हा आघाडीचे नेतृत्व करण्याचा आहे. आघाडीचे नेते संकुचित विचारधारेला तिलांजली देत नाहीत तोपर्यंत आघाडीचा हेतू साध्य होण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही. इंडिया आघाडीची पहिली गरज म्हणजे त्यातील नेत्यांमध्ये परस्पर सहमती आणि एकजुटता होय. मात्र, चौथ्या बैठकीत याचे खास तसे संकेत दिसून आले नाही. येत्या मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्थात, जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी उरला असताना आघाडीच्या नेत्यांमध्ये मूळ मुद्द्यावर अद्याप एकमत झालेले नाही.
2019 च्या निकालाची आकडेवारी बघितली तर, भाजपने 224 अशा जागा जिंकल्या आहेत जेथे मतांची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 2014 मध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त मताने जिंकलेल्या जागा या 136 होत्या. याउलट विरोधक, विशेषतः काँग्रेस पक्ष दुभंगलेला राहिला. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने 37 जागा मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. 2019 मध्ये हाच आकडा 18 जागांवर आला. अलीकडेच भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये निर्णायक विजय मिळविला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला या विजयाचा मोठा फायदा होईल असे चित्र आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 436 जागा लढविल्या होत्या आणि 303 जागांवर विजय मिळविला. विजयाचा हा दर 70 टक्क्यांएवढा आहे, हे येथे उल्लेखनीय. तर 37.4 टक्के मते मिळाली होती. याउलट, काँग्रेस पक्षाने 2019 मध्ये 52 जागा मिळविल्या आणि मतांची टक्केवारीसुद्धा कमी झाली होती.
भाजपच्या विजयात हिंदी भाषिक राज्यांचा वाटा मोठा राहणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचा विजय लोकसभेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलेल अशी भाजपला आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाला 2024 मधील दुसर्या विजयाची भविष्यवाणी म्हटले आहे. या राज्यांमध्ये भाजपचा लोकसभा निवडणुकीतील मतांचा वाटा त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांपेक्षा खूप जास्त आहे. ही बाब पंतप्रधानांमुळे शक्य झाली असा भाजपचा दावा आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत मिळणार्या मतांची टक्केवारी ही कमी असते असे दिसून आले आहे. देशात सध्या एक पक्षीय सत्ता बहाल झाली असल्याचेही दिसून येते. 2014 पूर्वी, बहुपक्षीय सत्ता असल्यामुळे सत्तेत सामील अन्य पक्ष सरकारचे नेतृत्व करणार्या पक्षाला कसे ब्लॅकमेल करीत असतात हे बघायला मिळाले होते आणि जनता यास कंटाळली होती. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. आणि काँग्रेसची टक्केवारी कमी झाल्याचेही दिसून आले आहे. परंतु, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसलाही संजीवनी दिली असे म्हणायला हवे. कारण, काँग्रेसने तिन्ही राज्यांची सत्ता गमावली असली तरी सत्ताधारी भाजपच्या तुलनेत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जास्त आहे.
यामुळे, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या उत्साहात कोणत्याही प्रकारची घट दिसून येत नाही. 2024 मधील लोकसभा निवडणुकीची तयारी करताना हा उत्साह आणि जमिनीवरील वास्तविक परिस्थिती काँग्रेसला बळ देणारी आहे. 2019 च्या निवडणुकीचे निकाल हे काँग्रेसच्या सुरुवातीच्या वर्चस्वाची आठवण करून देणार्या एका पक्षाच्या वर्चस्वाच्या युगाला बळकटी देणारे आहे हे विसरून चालणार नाही. मोदी यांनी 3 डिसेंबरच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निकालाला सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय म्हटले होते. तर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेसचा 40 टक्के मतांचा वाटा कायम असल्याची आठवण करून दिली आहे.