– वंदना बर्वे
दक्षिण भारतातील पाच राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या 132 जागा आहेत. 2024च्या लोकसभेसाठी भाजपाने दक्षिणेत मोहीम सुरू केली आहे. ती किती यशस्वी ठरेल, त्याबाबत…
18व्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. दक्षिणेतील 132 जागांवरही विजय कसा मिळविता येईल? याची रणनीती भाजपच्या रणनीतिकारांनी निश्चित केली आहे. मोदी यांनी आतापर्यंत केरळ, लक्षद्वीपचा दौरा केला आहे. या ठिकाणी मोदी अनेक कार्यक्रमात सहभागी झालेत. रोड शो केला आणि रॅली काढली. भाजपने दक्षिणेतील राज्यांवर फोकस केला असला तरी या भागात भाजपची कामगिरी कशी राहिली आहे? काँग्रेसची कामगिरी कशी आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे.
दक्षिणेतील सर्वाधिक जागा असलेलं राज्य म्हणजे तामिळनाडू. येथून 39 खासदार निवडून जातात. यानंतर कर्नाटक (28), आंध्र प्रदेश (25) आणि केरळ (20) खासदार येतात. याशिवाय तेलंगणातून 17 खासदार आणि पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारमधून प्रत्येकी एक-एक खासदार निवडून येतात. अशा प्रकारे, दक्षिण भारतातील पाच राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभेच्या एकूण 132 जागा आहेत. 2019मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल बघितला तर लक्षात येईल की, भाजप आणि कॉग्रेस या दोन्ही पक्षांना 29-29 जागा मिळाल्या होत्या. उर्वरित 74 जागांवर अन्य पक्षांनी विजय मिळविला होता. यात तामिळनाडूमध्ये द्रमुकने 24 जागा जिंकल्या होत्या आणि आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसने 22 जागा जिंकल्या होत्या. भाजपला दोनच राज्यात विजय मिळाला. कर्नाटकात 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या आणि तेलंगणातील 17 पैकी 4 जागांवर यश मिळाले. उरलेल्या एकाही राज्यांत भाजपला खातंही उघडता आलं नव्हतं.
2019च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक यश मिळालं ते केरळमध्ये. काँग्रेसला येथे 20 पैकी 15 जागा मिळाल्या. तामिळनाडूमध्ये 8 जागा मिळाल्या. काँग्रेसने यावेळी द्रमुकसोबत आघाडी करीत 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या. द्रमुकने 24 जागांवर निवडणूक लढविली आणि सर्व जागा जिंकल्या. अन्नाद्रमुकला फक्त एक जागा मिळाली होती. तेलंगणात काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. आता तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली आहे. यापूर्वी कर्नाटकची सत्ता मिळाली आहे. 2019 मध्ये काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. याशिवाय पुद्दुचेरी आणि अंदमान-निकोबारमध्येही एक-एक जागा मिळाली होती.
2019च्या निवडणुकीत भाजपला दक्षिणेत अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी यावेळची कामगिरी ही सर्वोत्तम होती. तब्बल 25 जागा जिंकल्या होत्या. यापूर्वी, 2014 मध्ये 22 जागा जिंकण्याचा रेकॉर्ड भाजपने बनविला होता. 2009 मध्ये भाजपने दक्षिणमध्ये 20 जागा, 2004 मध्ये 18 जागा, 1999 मध्ये 19 जागा आणि 1998 मध्ये 16 जागा जिंकल्या होत्या. त्यापूर्वीच्या निवडणुकीत पक्षाला दक्षिणेत 10 जागाही जिंकता आल्या नव्हत्या. भाजपची स्थापना झाल्यानंतर 1984 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिणेत आपले खाते उघडण्यात यश आले होते. यावेळी आंध्र प्रदेशात एक जागा मिळाली. यानंतर 1989 मध्ये एकही जागा मिळाली नाही. 1991 मध्ये कर्नाटकात चार आणि आंध्र प्रदेशात एक जागा जिंकली होती. 1996 मध्ये दक्षिणेत सहा जागा जिंकल्या होत्या. या सर्व जागा कर्नाटकातील होत्या.
मागील दहा निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर दक्षिणेतील काँग्रेसची कामगिरी सर्वोत्तम राहिली ती 1989 मध्ये. त्या निवडणुकीत काँग्रेसने 110 जागा जिंकल्या होत्या. 2014 मध्ये सर्वात कमी 19 जागा मिळाल्या होत्या. 2019 मध्ये काँग्रेसने चांगले प्रदर्शन करीत 29 जागा जिंकल्या. 2004 मध्ये काँग्रेसने 48 आणि 2009 मध्ये 62 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 1999 मध्ये 35, 1998 मध्ये 45, 1996 मध्ये 37, 1991 मध्ये 92 आणि 1984 मध्ये 71 जागांवर विजय मिळाला होता. 2024च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी केरळमधील महिलांशीही संवाद साधला. या कार्यक्रमात दोन लाख महिला सहभागी होतील, असा दावा भाजपने आधीच केला होता. दक्षिणेकडील मोदी यांचा दौरा 2024च्या निवडणुकीच्या प्लॅनशी संबंधित आहे.
भाजपने दक्षिणेवर आपले लक्ष केंद्रित केले असल्याची जाणीव पहिल्यांदाच होत आहे असे नव्हे तर मागील वर्षभरात असे कितीतरी संकेत भाजपकडून मिळाले आहेत. संसदेच्या नवीन इमारतीचे मागील मे महिन्यात उद्घाटन झाले होते. यावेळी संसदेच्या भव्यतेविषयी जेवढी चर्चा झाली त्यापेक्षा जास्त चर्चा अडीच हजार वर्षांपूर्वी चोल वंशातील राजांना सत्ता हस्तांतरित करताना देण्यात आलेल्या सेंगोलची (राजदंड) झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळ मठांच्या धर्मगुरूंच्या आशीर्वादाने हा राजदंड लोकसभेत बसविला होता. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत याचा चांगला परिणाम तमिळनाडूमध्ये दिसून येण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तविली आहे. 2022 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ बनारसमध्ये काशी तमिळ समागम आयोजित करत आहेत. महिनाभर चालणार्या या परिषदेत 17 तमिळ प्रमुख मठांमधील 300 हून अधिक संत आणि धार्मिक नेते सहभागी झाले होते. त्याचा दुसरा टप्पाही गेल्या महिन्यात आयोजित केला होता. ‘चारशे पार’चे ध्येय गाठायचे असेल तर भाजपला दक्षिणेवर लक्ष केंद्रित करावे लागेल.