नारायणगाव – जनसेवा तरुण मंडळ, ग्रामस्थ व नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या राजा शिवछत्रपती महाद्वाराचा युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते नेत्रदीपक लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. 6) पार पडला. यावेळी संपूर्ण नारायणगावनगरी भगवीमय झाली होती.
राजा शिवछत्रपती महाद्वाराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम तीन दिवस सुरू होता. यामध्ये सोमवारी (दि. 4) किल्ले शिवनेरी ते नारायणगाव मृदा कलश मिरवणूक, संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची मिरवणूक, मंगळवारी (दि.5) होम हवन व पूर्णाहुती तर बुधवारी (दि.6) छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
कार्यक्रमास खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, प. पु. आनंतघोष मौनीबाबाजी, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, सुरगाणा संस्थानचे अतिषराजे पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, विघ्नहरचे संतोष खैरे, सत्यशील शेरकर, अक्षय आढळराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच योगेश पाटे म्हणाले की, ज्या शिवाजी महाराजांनी मराठ्यांच साम्राज्य सांभाळलं त्यांच सिंधुदुर्ग किल्ल्यात मंदिर निर्माण केले आहे. त्या मंदिरात शिवाजी महाराजांची पायात पादत्राणे नसलेली व गादीवर बसलेली मूर्ती आहे. तसाच सुंदर पुतळा आपण बसविला हे अभिमानास्पद आहे. 1983 ला या ठिकाणी ज्येष्ठांनी शिवाजी स्मारक उभे केले, त्यांचाच आदर्श घेऊन हे काम केले आहे. जुन्नरची ओळख फक्त शिवनेरी एवढीच न राहता शिवनेरीला संरक्षण देणारे जीवधन व हडसर सारखी किल्ले आहे.
दुर्गप्रेमी संघटनांना बरोबर घेऊन आपण 50 किल्ल फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून संवर्धन व जतन करणारे आहोत. यासाठी आपल्याला राज्यकर्ते व शिवभक्तांची गरज आहे. रायगडावरील रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर अशाच प्रकारे फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून भव्यदिव्य प्रवेशद्वार निर्माण केले जाणार आहे. त्यावेळी श्रमदान करण्यासाठी पहिला मान जनसेवा मित्र मंडळ व नारायणगावच्या शिवभक्तांना असेल.
यावेळी अल्फाडान्स अकॅडमीने मंचावर शिवप्रताप सोहळा सादर केला. यातील मावळ्यांची वेशभूषा लक्षवेधी होती. प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेली राजा शिवछत्रपती महाराजांची मूर्ती नारायणगावातील करोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंब उद्ध्वस्त झालेल्या एका भाजी विक्री करणाऱ्या महिलेने कुटुंबातील सदस्यांची आठवण म्हणून दिली आहे. हे सांगताना नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्या डोळ्यातून अश्रू आले.