नवी दिल्ली- भारतातील करोनाबाधितांची संख्या रोज वाढते आहे. जवळपास लाखाच्या घरात रोज नवे रूग्ण आढळत आहेत. हा आकडा तेथे स्थिरावल्यासारखा झाला आहे. मात्र भारताच्या संदर्भात चक्रवणारी बाब म्हणता येईल ती अशी की करोना अद्याप त्याच्या शिखरावर पोहोचलेलाच नाही. तज्ञांच्या मते करोनाने सर्वोच्च शिखर गाठल्यावर त्याचा उतरतीचा प्रवास सुरू होतो. जो फेस भारतात आलेलाच नाही.
यांसदर्भात अमेरिकेचे उदाहरण दिले जाते आहे. अमेरिकेत जुलै महिन्यातच करोनाच्या सर्वाधिक केसेस सापडल्या होत्या. त्याचप्रमाणात लोकांचे मृत्यूही झाले. नंतर करोनाची घसरण सुरू झाली. भारतात मात्र लोकसंख्येच्या तुलनेत विचार करायचा झाला तर नवे रूग्णवाढीचा वेग तसा कमीच आहे. त्याहून वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे भारतात रूग्ण बरे होण्याचा वेग तितकाच प्रचंड आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे.
अमेरिका, इटली आदी देशांचा करोना इतिहास पाहिल्यावर भारताबाबत काही तज्ञांनी भविष्यवाणी केली होती. भारतात जानेवारी अखेरीस करोनाचा शिरकाव झाला होता. त्यावेळी भारतात याचा प्रसार वेगाने होणार आणि मृत्यूचा कहर सुरू होईल अशी भीती व्यक्त केली गेली. मृत्यू इतके होतील की मृतदेह मोजणे अवघड होउन बसेल असा दावाही केला गेला. मात्र सुदैवाने तसे अद्याप काही घडलेले नाही.
उलट बरे होणारे रूग्ण आणि नगण्य मृत्यू ही अत्यंत दिलासा देणारी बाब ठरली आहे. करोनाचे रूग्ण झपाट्याने बरे होत असले तरी करोना पूर्णपणे नाहीसा होण्यास अजुन बराच काळ लागेल असा अंदाजही तज्ञ व्यक्त करत आहेत.
अमेरिका आणि इटलीचे उदाहरण समोर आहेच. त्यानंतर स्वीडन आणि ब्रिटननेही हर्ड इम्युनिटीच्या गृहीतकावर विश्वास ठेवला. हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची प्रतिकार शक्ती. त्या जोरावर एखाद्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखता येउ शकतो. सुदैवाने भारताने हा मार्ग न पत्करता तात्काळ लॉकडाउनचा पर्याय पत्करला व त्यामुळे मोठी हानी झाली नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.
आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यांच्याकडून एक तर्क दिला जातो आहे. तो म्हणजे हर्ड इम्युनिटी विकसित होण्यासाठी समूहातील किमान 70 टक्के लोकांना त्याची बाधा होणे अपेक्षित असते. तर सामूहिक प्रतिकार शक्ती विकसित होउ शकते. भारतात 70 टक्के बाधित झाले असते, तर काय थैमान माजले असते, याचा विचार न केलेलाच बरा.
शिवाय हर्ड इम्युनिटीचा प्रयोग करण्याचे धाडस तेव्हाच केले जाउ शकते, जेव्हा त्या विशिष्ट आजारामुळे मृत्यूचा धोका अत्यंत कमी किंवा नगण्य असतो. त्याचबरोबर त्या आजारावर औषध उपलब्ध झालेले असायला हवे. करोनाच्या बाबतीत तसे काहीच नव्हते आणि नाही. त्यामुळे या मार्गाने न जाता भारताने योग्यच अंमलबजावणी केली असा युक्तीवाद केला जातो आहे.
बाधित बरे होणे आणि मृत्यूदर कमी राखणे हेही भारतातील जिवनशैली आणि अंगभूत वैशिष्ट्यामुळेच शक्य झाल्याचे म्हटले जात आहे.
या थीअरीनुसार या क्षेत्रातले तज्ञ प्रा. ज्ञानेश्वर चौबे यांच्या म्हणण्यानुसार भारतात आधुनिक मानवाचे अस्तित्व गेल्या 70 हजार वर्षांपासून आहे. या प्रदीर्घ काळात विविध महामारी आणि आजारांचा सामना मानवाने केला आहे. भौगोलिक स्थिती आणि आनुवंशिकता यामुळे निश्चितपणे भारतीयांमध्ये आजारांच्या विरोधातील प्रतिकार क्षमता विकसित केली आहे व त्यात वाढच केली आहे.
भारतीयांमध्ये अंर्तविवाह प्रथा आणि अन्य बाबींमुळे एक वेगळीच सेल्फ इम्युनिटी विकसित झाली असून त्यामुळेच करोना पराभूत होत असल्याचे दिसून येते आहे.