शेवगाव, दि. 13 (प्रतिनिधी)- तालुक्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. येत्या चार दिवसांत पाऊस झाला नाही तर खरीप पिकांना फटका बसू शकतो. शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाची भिती व्यक्त करीत आहेत.
गेल्या महिन्यात तालुक्यात पावसाने हजेरी लावली, मात्र तो समाधानकारक झालेला नाही.अनेक मंडळात जेमतेमच झाला आहे. तरीही नजीकच्या काळात चांगला पाऊस होईल, या आशेने पेरणी झाली आहे. तालुक्याचे खरिप हंगाम उद्दिष्टाचे क्षेत्र 84 हजार 902 हेक्टर क्षेत्र असून तालुक्यात आजअखेर 56 हजार हेक्टर म्हणजे उद्दिष्टाच्या सुमारे 61 टक्के पेरणी झाली आहे.
मागील हंगामात कपाशीला 10 हजारापर्यंत वाढलेला भाव घसरून 7 ते 8 हजार प्रति क्विंटलवर आला. तरीही यंदाच्या खरीप हंगामात आज खेर जवळपास 42 हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी लागवड झाली आहे. त्याखालोखाल तूर 7 हजार 300 हेक्टर, सोयाबीन 85, उडीद 45,मुग 34 हेक्टरची पेरणी झाली आहे. सध्या ही पिके पाण्यावर आली आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे. तालुक्याची जीवन रेखा म्हणून ओळख असणाऱ्या जायकवाडी जलाशयाचा पाणीसाठा 27 टक्क्यांच्या आसपास खाली आल्याने दहिगाव ने, मुंगी पट्यातील बागायती क्षेत्रातील खरीप पिकांसह फळबागा देखील अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे सर्वांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. येत्या चार दिवसांत पाऊस झाला नाही तर खरीप पिकांना फटका बसू शकतो. शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाची भिती व्यक्त करीत आहेत.