वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
नारायणगाव- जिल्हाबंदी व संचारबंदी लागू असताना मुंबईतून भाजीपाल्याच्या गाडीत आणलेल्या एका व्यक्तीसह गाडी चालकावर आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जयसिंग बबन शिंदे (वय 41, सध्या रा. मारूती गल्ली भायखळा, मुंबई, मूळ रा. रायकरवाडी पिंपळवंडी, ता. जुन्नर) व वाहनचालक अक्षय बाळासाहेब रायकर (वय 28, रा. रायकरवाडी पिंपळवंडी, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोंडीभाऊ डामसे यांनी दिली आहे.
टी. वाय. मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी केली असताना देखील जयसिंग बबन शिंदे हे (दि.21) पहटे 5 वाजता त्यांच्या ओळखीचे भाजीपाला वाहनचालक अक्षय बाळासाहेब रायकर यांच्या वाहनातून भायखळा येथून खंडाळामार्गे पिंपळवंडी येथे आले. त्यांनी येण्यापूर्वी पिंपळवंडी गावातील प्रशासनाची कोणतीही परवानगी अगर पास न घेता आले. त्यानंतर गावात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनास दिली नाही. त्यांनी स्वतःची व कुटुंबाची करोना संसर्ग खबरदारीचे अनुषंगाने वैद्यकीय तपासणी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्नर पंचायत समितीच्या वतीने सुरू असलेल्या आरोग्य विभागाच्या तपासणी यादीत ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी सर्व खातरजमा करून (दि.22) जयसिंग शिंदे आणि वाहनचालक अक्षय रायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला .