– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात आर्च रायव्हली दिसण्यापेक्षा हर्ष लायव्हली दिसत आहे व हीच क्रिकेटसाठी व खेळभावनेसाठी धोकादायक आहे. वेळीच उपाय केले गेले नाहीत तर या खेळाला सभ्य गृहस्थांचा खेळ, असे कोणीही म्हणणार नाही. लखनौ सुपर जायंट्स व रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील लढतीत विराट कोहली, गौतम गंभीर व नवीन उल हक यांच्यात व यांच्यामुळे जे काही घडले ते खेळभावनेलाच नव्हे तर संपूर्ण आयपीएल स्पर्धेलाच गालबोट लावणारे ठरले यात शंका नाही. हे असले अनुचित प्रकार रोखण्यासाठी बीसीसीआय तसेच आयपीएल समिती यांची आचारसंहिता आहे व त्यानुसारच कारवाई केली जाते.
मात्र, या कारवाईचे स्वरूप मुख्यत्वे आर्थिक दंड करण्याचेच राहिले आहे. यातील कठोर नियमांच्या तरतुदींनुसार खरेतर कारवाई होणे गरजेचे आहे. लखनौच्या खेळाडूंनी बंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केल्यावर जे केले त्याची परतफेड कोहलीने लखनौला त्यांच्याच घरात पराभूत केल्यावर केले. ही एक बाजू झाली. मात्र, त्यानंतर गंभीरने मैदानावर तो आकांडतांडव केला तो टाळता आला असता.
एक तर हा माणूस विश्वकरंडकासह भारतीय संघाच्या अनेक विजयात मोलाचा वाटा घेणारा खेळाडू आहे. तसेच कोहलीसह तोदेखील दिल्लीचाच आहे. मग तरीही या दोघांत इतका तितकारा का व कशासाठी. एकतर हे दोघेही खेळाडू समकालीन नव्हे, काही काळ एकाच संघात खेळले असलेले तरीही गंभीर वरिष्ठ आहे. त्यातच तो एका पक्षाचा खासदारही आहे. त्यानेच अनियंत्रित वर्तन करावे याचे आश्चर्य वाटते.
सामना संपल्यावर पहिल्यांदा या दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले त्यावेळी सबकुछ ठीक वाटत होते. मग नवीन याने त्यात तेल का ओतले, त्यामुळेच तर पुन्हा एकदा वाद वाढला. बरे यावर कारवाई काय तर कोहलीला सामना रकमेच्या शंभर टक्के दंड, गंभीरला 50 टक्के तर नवीनला 25 टक्के दंड केला गेला. त्याने काय होणार आहे. हे खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून इतका प्रचंड पैसा कमावतात की त्यांच्यासाठी ही दंडाची रक्कम म्हणजे पीनट्स ठरतात.
कारवाई अशी झाली पाहिजे की केवळ याच खेळाडूंवर नव्हे तर मैदानावर कोणत्याही नवोदित खेळाडूलाही असे काही कृत्य करण्यासाठी जरब बसेल. कोहली हा भारतीय क्रिकेटचा चेहरा मानला जातो, त्यानेच असे वागावे, मग जगात काय संदेश पोहोचेल.
याचसाठी आचारसंहितेतील तरतुदीनुसार अशी घटना घडल्यावर त्यासाठी जबाबदार असलेल्या खेळाडूंना एकतर तीन ते पाच सामन्यांची बंदी लावली गेली पाहिजे किंवा असेच प्रकार यापूर्वीही एखाद्या खेळाडूकडून घडले असतील तर त्याला आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित सर्व सामन्यांतून बाहेर काढले गेले पाहिजे. इतकी कठोर कारवाई झाली तरच खेळाडूंच्या वर्तनात फरक पडेल. खेळ मोठा की खेळाडू हे आता ठरवण्याची वेळ आली आहे.