नवी दिल्ली – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी निराशाजनक असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) यांनी म्हटले आहे. मात्र हा तात्पुरता धक्का असून आम्ही लवकरच या धक्क्यातून सावरून लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागू अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. त्यांनी कॉंग्रेसला (Congress) मोठे बहुमत दिल्याबद्दल तेलंगणातील जनतेचे आभार मानले.
खर्गे म्हणाले की पक्षाने या चारही राज्यांमध्ये उत्साही प्रचार केला आणि लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या चारही राज्यांत ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केले त्यांचे आम्ही आभार मानतो परंतु आम्ही दृढनिश्चयाने या तिन्ही राज्यांमध्ये आमची कामगिरी सुधारून पक्षाची पुनर्रबांधणी करू असा विश्वास खर्गे यांनी आपल्या एक्सवरील पोस्टवर व्यक्त केला आहे. (4 State election result)
आम्ही तात्पुरत्या अडथळ्यांवर मात करू आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील पक्षांसह स्वतःला पूर्णपणे तयार करू,असे काँग्रेस प्रमुखांनी ठामपणे सांगितले.
फडणवीसांचा काँग्रेसला टोला
आता पनवती कोण आहे हे काँग्रेसला कळलं असेल. निवडणूक निकालात ते दिसून आलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असे शब्द वापरणार नाहीत याची मला खात्री आहे. “जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच हे यश आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवलं आहे की सरकार त्यांच्यासाठी काम करतं आहे. त्याचं प्रत्यंतर लोकांना पाहण्यास मिळालं हा त्याचा विजय आहे” असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटल आहे. (Bjp Vs congress)