– सारंग कुलकर्णी
राजकारणी लोकांनी जबाबदारीने बोलायला हवे असे सर्वोच्च न्यायालयही सांगते आहे. त्यावेळी त्याकडे आणि आपण जे बोलतो त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
नेत्यांचा संयम सुटू लागला की समजायचे निवडणुकांची चाहुल लागली. विशिष्ट धर्माची कड आणि विशिष्ट धर्माच्या विरोधात फुत्कार निघण्यास सुरुवात झाली की समजायचे मतपेढीची जुळवाजुळव सुरू झाली. त्यांच्या विधानांना खरेतर फारसे महत्त्व देण्याची गरज नसते. तथापि, या नेते वर्गाचा समाजात बराच मोठा प्रभाव असतो त्यामुळे त्याची इच्छा नसली, तरी दखल घेणे भाग होते. त्यातले बरे-वाईट समोर मांडावे लागते. गेल्याच महिन्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने द्वेषमूलक विधाने रोखण्यासाठी काय करता येईल अशी विचारणा आणि काही निर्देश दिले होते. त्यांच्या या निर्णयाची शाई वाळतही नाही तोपर्यंत तमिळनाडूतील एका नेत्याने भडक विधान करून द्वेष अंगात किती भिनला आहे याचा साक्षात्कार घडवला आहे.
तमिळनाडूत द्रमुक या पक्षाची सत्ता आहे. हा पक्ष बहुमताने सत्तेवर आहे, याचा अर्थ कोणाच्या कुबड्यांवर त्यांची सत्ता अवलंबून नाही. तरीही केंद्रातील विरोधी पक्षांच्या आघाडीचा हा घटक झाला आहे. या पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी प्रक्षोभक विधान केले आहे. त्यांनी धर्माच्या संदर्भात अनावश्यक टिप्पणी केली आहे. उदयनिधी स्वत: मंत्री आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. स्टॅलिन यांचा तमिळनाडूत बऱ्यापैकी कारभार सुरू आहे. ज्या अद्रमुकचे त्यांना मुख्य आव्हान असायचे तो पक्ष पूर्णत: विस्कळीत झाला आहे. असे सगळे सुरळीत चालले असताना आणि केंद्रात आकाराला येऊ घातलेल्या आघाडीचे सन्माननीय सदस्यत्व मिळालेल्या पक्षाच्या नेत्याने समाजातील एका मोठ्या वर्गाचा रोष ओढवून घेण्याचे वास्तविक काही कारण नव्हते.
तरीही उदयनिधी यांनी भडक विधान केले. त्यांनी धर्माची तुलना काही रोगांशी केली आणि त्यांचे उन्मूलन करण्याचे फुत्कार सोडले. विशेष बाब अशी की ज्या कार्यक्रमात त्यांनी ही विधाने केली त्या कार्यक्रमाचे नावच उन्मूलन संमेलन असे ठेवण्यात आले होते. असे कोणत्याही धर्माच्या उन्मूलनाच्या गप्पा करणे आणि सार्वजनिकपणे तसे करणे हेच मुळात आपत्तीजनक. त्या कार्यक्रमात एक विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून अत्यंत विखारी विधाने करणे हा सगळाच प्रकार घृणास्पद आणि नंतर पुन्हा त्याचे समर्थन करणेही लाजीरवाणे.
मुख्यमंत्री स्टॅलिन सुरुवातीचे काही तास गप्प असले तरी उदयनिधी यांची विधाने त्यांना फार काळ मौन साधू देणार नाहीत. लोकसभेचा बिगूल आता वाजणार आहे आणि त्यांच्या विरोधकांना हा मुद्दा पुरेसा आहे. उदयनिधी यांनी पित्याची आणि पक्षाचीच अडचण केलेली नाही, तर त्यांनी ज्या विरोधी पक्षांसोबत ते जाणार आहेत त्या सगळ्यांची अडचण केली आहे.
द्रमुकला सोबत न्यायचे म्हणजे या अन्य पक्षांना एकतर मौनात राहणे पसंत करावे लागेल किंवा स्टॅलिन यांचा विरोध करावा लागेल. या दोन्ही बाबी त्यांच्यासाठी अडचणीच्याच. सगळ्यात जास्त अडचण झाली आहे ती कॉंग्रेसची. त्याचे कारण कॉंग्रेस आणि द्रमुक हे जुने मित्र पक्ष आहेत. राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतर निर्माण झालेली कटुता बरीच मागे पडली आहे. या दोन्ही पक्षांनी परस्परांशी जुळवून घेतले आणि स्नेहसंवर्धनही केले. द्रमुकचे दिग्गज नेते दिवंगत करुणानिधी यांच्या पक्षात स्टॅलिन त्यांचे राजकीय उत्तराधिकारी ठरले. पक्षावर आणि सत्तेवर त्यांनी पकड मिळवली. या स्टॅलिन यांचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चांगले ट्युनिंग आहे. विरोधकांच्या 25-28 पक्षांच्या आघाडीत आज पंतप्रधानपदासाठी उतावीळ झालेले अनेक नेते असले तरी या आघाडीचे नैसर्गिक नेतृत्व कॉंग्रेसकडेच आणि पर्यायाने राहुल यांच्याकडेच जाते. अशा परिस्थितीत सरकारच्या चुका हेरताना, त्यावर बोट ठेवत सरकारची कोंडी करताना आपल्याच सैन्यात कोणाचा तरी घोडा उधळत असेल तर ते आघाडीला आणि आघाडीच्या नेतृत्वाला मारक ठरते.
राहुल गांधी यांनी मोहब्बत की दुकानचा संदेश भारत जोडो यात्रेत दिला. ते आजही द्वेष संपविणे आणि लोकांना प्रेमाने जोडण्याची भाषा करतात आणि त्यावरच विश्वास ठेवतात. असे असताना त्यांच्या आघाडीतील एक नेता समाजातील 80 टक्के लोकांची ज्या धर्मावर श्रद्धा आहे त्यांच्या संदर्भात धक्कादायक विधान करत असेल तर त्यातून कोणता संदेश जातो याचा आघाडीच्या धुरिणांनी अभ्यास करावा. मुळात भारत आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी ओळखला जातो. अनेक धर्मांची आणि विचारांची माणसे येथे अनेक शतकांपासून सामंजस्याने नांदत आहेत. काही तात्कालिक मतभेद झाले तरी परस्परांच्या धर्माचा ते आदरच करतात. धर्म आणि श्रद्धा हा विषय सर्वसामान्यांसाठी अत्यंत संवेदनशीलही असतो. त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरताना सहसा या मुद्द्याच्या वाटेला न जाणेच शहाणपणाचे. मात्र राजकारण सगळीकडेच शिरल्याने तसे होत नाही, उलट हाच मुद्दा तापत ठेवत त्याच्या अनुषंगाने आपले राजकारण करण्याची प्रथा रूढ झाली आहे.
कोणत्या धर्मात अथवा लोकांची ज्यावर श्रद्धा आहे त्यात काही दोष कोणाला आढळत असेल, तर त्याला आक्षेप नाही. त्यात त्यांना काही सुधारणा सुचवायची असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र हे करताना लोकांच्या श्रद्धेलाच हादरा देण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आपल्या समाजाची रचना आणि तेथील रूढी, परंपरा या मुळात समजून घेणे गरजेचे आहे. त्याचे समर्थन करण्याचे बंधन कोणावरही नाही, मात्र त्या का आहेत याची माहिती असायला हवी. तशी ती असली की विनाकारण जोशात येऊन आपले राजकारण चमकवण्याची उबळ कोणाला येत नाही. मुळात आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्याच समाजात परस्परांमध्ये द्वेष आणि संघर्ष निर्माण करून साध्यही काही होत नाही. वैचारिक मतभिन्नता प्राचीन काळापासून चालत आली आहे. वेळोवेळी धर्मावर आधारलेल्या भिन्न विचारधारांमध्ये संघर्ष झाले आहेत. मात्र त्या प्रत्येक वेळी त्या त्या काळच्या समाजसुधारकांनी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे.
भेदभाव, श्रेष्ठ-कनिष्ठ, महिलांना दुय्यम दर्जा अशा अनेक विषमता निर्माण करणाऱ्या गोष्टी होत्या. त्यातील बहुतेक बाबी अजूनही आहेत, मात्र ही विषमता एका विशिष्ट टोकापर्यंत हद्दपार करण्यास समाजश्रेष्ठांना यश मिळाले आहे ते नाकारता येणार नाही. प्रत्येक धर्मात काही विकृत व्यक्ती असू शकतात. त्यांची एकदा ओळख पटली की त्या दूर करण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू करता येते आणि त्याला काही काळ द्यावा लागतो. त्याकरता संबंधित व्यक्ती अथवा परंपराच नष्ट करण्याची भाषा करणे समाजाचे स्वास्थ्य बिघडवण्यासारखेच आहे.
परिवर्तनाची कथित हाक देणाऱ्यांच्या आघाडीत सहभागी होताना मुळात हे परिवर्तन स्वत:त घडवून आणणे आवश्यक.