नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर केला. गेल्या काही महिन्यांपासून कोश्यारी हे आपल्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. अखेर राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बैस यांनी यापूर्वी त्रिपुरा,झारखंड अशा राज्यांच्या राज्यपाल पदांची जबाबदारी देखील सांभाळलेली आहे.
सर्व सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री मंडळापर्यंतचा बैस यांचा आजवरचा राजकीय प्रवास आहे. भारतीय जनता पक्षातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रायपूर महानगरपालिका, मध्य प्रदेश विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणूक जिंकलेले रमेश बैस हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
सामाजिक जीवनाला सुरुवात करून राजकारणात आल्यानंतर रमेश बैस 1978 मध्ये रायपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले होते.यानंतर त्यांचा राजकीय प्रवास अखंडपणे सुरू राहिला.1980 ते 1984 या काळात ते मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्यही होते. 1989 मध्ये, ते संयुक्त मध्य प्रदेश (आता छत्तीसगड) च्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. पुढे त्यांनी तब्बल सात वेळा लोकसभेत नेतृत्व केले. लाल कृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय होते.
रमेश बैस कधीही निवडणूक हरले नाहीत. 2019 मध्ये सलग निवडणुका जिंकूनही त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. मात्र निवडणुकीनंतर त्यांना त्रिपुराचे राज्यपाल करण्यात आले. रमेश बैस हे लालकृष्ण अडवाणी आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्याही ते जवळचे होते. सुषमा स्वराज रमेश बैस यांना आपला भाऊ मानत होत्या.
2 ऑगस्ट 1947 रोजी जन्मलेल्या रमेश बैस यांनी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. अशाप्रकारे महामंडळापासून ते केंद्र सरकारपर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या रमेश बैस यांना संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत.