मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक स्थापन केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. वारीशे (वय 48) यांची 6 फेब्रुवारी रोजी हत्या झाली होती. जमीन व्यवहाराचे दलाल पंढरीनाथ आंबेरकर यांनी त्यांच्या गाडीला जाणिवपुर्वक धडक देऊन त्यांना जबर जखमी केले. रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आंबेरकर या परिसरात प्रस्तावित रिफायनरीच्या भूसंपादनास विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला धमकावत असे. आंबेरकर यांच्या कारवायांच्या संबंधात वारिशे याने स्थानिक मराठी वृत्तपत्रांत लेख लिहुन त्याच्या भानगडींवर प्रकाश टाकला होता. त्यामुळे त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली असे सांगितले जात आहे.
दरम्यान, आता या प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी पत्र लिहिले आहे. पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी संजय राऊत यांनी हे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
मा.गृहमंत्री
महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? pic.twitter.com/AlpM1U4Twh— Sanjay Raut (@rautsanjay61) February 11, 2023
संजय राऊत यांचे पत्र…!
सत्यमेव जयते, संजय राऊत, खासदार (राज्यसभा)
प्रिय श्री. देवेंद्रजी… जय महाराष्ट्र!
राज्याचे गृहमंत्री म्हणून ढासळणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आपल्यासारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्याकडे गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्यात दिवसाढवळ्या खून पडावेत व संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा, हे चिंताजनक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील तरुण पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली. या हत्येस अपघाताचे स्वरूप दिले असले तरी ही हत्याच आहे. पत्रकार वारिशे हे कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीविरुद्ध सातत्याने आवाज उठवत होते. ते याबाबत लिखाण करीत होते व रिफायनरीचे समर्थक म्हणवून घेणारे गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना धमक्या देत होते.
रिफायनरीस कोकणातील जनतेचा विरोध आहे. जरी आपले याबाबत वेगळे मत असले तरी स्थानिक जनता या रिफायनरीविरुद्ध संघर्ष करीत आहे व शशिकांत वारिशेसारखे पत्रकार रिफायनरीविरुद्ध लोकांना जागृत करीत होते, हे सत्य नाकारता येणार नाही. त्या वारिशे यांची हत्या होणे ही महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी घटना आहे. मी खालील दोन गोष्टींकडे अपले लक्ष वेधू इच्छितो.
१) दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी कोकणातील आंगणेवाडी जत्रेत भारतीय जनता पक्षाची एक जाहीर सभा झाली. त्या सभेत आपण ठासून सांगितले की, नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतेय ते पाहू व आपल्या वक्तव्यास चोवीस तास उलटत नाहीत तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. हा फक्त योगायोग समजावा काय?
२) महाराष्ट्रात घटनाबाह्य सत्तांतर झाल्यानंतर, रत्नागिरीचे राजकीय पालकमंत्री व त्यांच्या समर्थकांनी ‘रिफायनरी विरोधकांना सरळ धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी यांना वापरण्यात आले. शशिकांत वारिशे यांच्यावर देखील पोलीस व इतर सरकारी यंत्रणांचा दबाव होता व रिफायनरीविरुद्ध भूमिका घेतली तर परिणाम भोगावे लागतील, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला. आपल्या आंगणेवाडीतील भाषणाने रिफायनरी समर्थकांतील गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला व वारिशे यांची हत्या झाली, असे आपणास वाटत नाही काय?