पुणे – राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. मात्र, शासनाच्या परवानगीशिवाय तसे करता येत नाही. वर्ग सुरू व्हावेत अशी मागणी विद्यार्थीदेखील करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी मागणी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.
राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यावेळी कुलगुरुंनी ही मागणी केली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता उपस्थित होते. राज्यपालांनी विद्यापीठाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला.
राज्यातील विद्यापीठांमधील अनेक संविधानिक पदे रिक्त असल्यामुळे विद्यापीठ प्रशासन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही पदे भरण्याची अनुमती द्यावी, अशीही मागणीही कुलगुरुंनी केली. या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यापीठांना संविधानिक पदे तातडीने भरण्याची अनुमती द्यावी अशी सूचना राज्यपालांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला केली. विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, असेही राज्यपालांनी सांगितले.
राज्यपाल म्हणाले, इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. अशावेळी महाविद्यालये व विद्यापीठातील प्रत्यक्ष वर्ग सुरू न होणे विसंगत व विपरीत वाटते. विद्यापीठांनी आपली शैक्षणिक वर्षे अगोदरच सुरू केली आहेत व ऑनलाइन पद्धतीने वर्गदेखील होत आहेत. आता करोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. अशावेळी महाविद्यालयीन वर्ग सुरू करता येईल का किंवा पाळीमध्ये चालवता येईल का याचा विद्यापीठांनी विचार करावा, असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील महाविद्यालये कसे सुरू करावे याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी वर्ग सुरू करण्याबद्दल आपण होऊन पुढाकार घेतला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.